फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पुन्हा होणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्रात सध्या २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. महापालिका निवडणुका संपत नाहीत तोपर्यंत फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोग याबाबत लवकरच मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रात महापालिका निवडणूक पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. याच आठवड्यामध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या मतदान होण्याची शक्यता आहे. राज्यामधील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहेl. यामधील १७ जिल्हा परिषद आणि ८८ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकाकडून केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची ३१ जानेवारीची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली आहे.



