जीवनशैली

जल हे जीवन आहे पण..अती पाणी पिण्याचे जाणून घ्या दुष्परिणाम

जल हे जीवन आहे… हे आपण नेहमी ऐकतो. पाणी पिण्याचे फायदेही आपल्याला माहीत आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास अनेक आजार होऊ शकतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरात पाण्याचे संतुलन कायम राहते आणि टॉक्सिक पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे संपूर्ण पोषण मिळते. पण जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभावही पडू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

हो, हे खरं आहे ! सामान्य प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायल्यानेआपल्या शरीरातील एकूण रक्ताचे प्रमाण वाढते आणि मूत्रपिंडांना अतिरिक्त पाणी फिल्टर करण्यासाठी जास्त काम करण्यास भाग पाडते. याशिवाय, त्यामुळे हृदयावर अधिक भार पडू शकतो. तसेच पोटात जळजळही वाढू शकते. ओव्हरहायड्रेशनमुळे अनेक त्रास होऊ शकतात.

ओव्हरहायड्रेशनमुळे म्हणजे काय ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पाण्याची नशा ही एक स्थिती आहे जी जास्त पाणी प्यायल्याने उद्भवते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते आणि रक्तातील सोडिअमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवते.

ओव्हरहायड्रेशनची लक्षणे कोणती ?

मळमळ – जे लोक जास्त पाणी पितात, त्यांना शरीरातील इलेक्ट्रोलाइटच्या असंतुलनामुळे अनेकदा तंद्री लागते तसेच उलटीची भावनाही होते.

डोकेदुखी- लोकांना दिवसभर डोकेदुखीचा त्रास जाणवतो. शरीरातील अतिरिक्त पाण्यामुळे शरीरातील मीठाची पातळी कमी होते आणि पेशी फुगतात, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो.

थकवा – जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या किडनीला शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे काही वेळा लोकांना थकल्यासारखे वाटू शकते तसेच ते विचलितही होऊ शकतात.

त्वचेचा रंग फिकट होणे – ओव्हरहायड्रेशनमुळे, तुमचे पाय, हात आणि ओठांना सूज येणे किंवा रंग फिकट झाल्यासारखे दिसू शकते. मूलत: पेशींची जळजळ होते, त्यासह त्वचेवर सूजही येऊ शकते.

किती जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशन होते ?

आरोग्य तज्ञ आणि पोषणतज्ञांच्या सांगण्यानुसार, आपले दैनंदिन पाणी सेवन वय, लिंग, शरीराचे वजन, दिवसभरातील क्रिया, हालचाल, मेटाबॉलिज्म आणि औषधे यासह विविध घटकांवर अवलंबून असते. खरंतर पाण्याच्या सेवनाची पातळी ही आपल्या पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून असते.

एका दिवसात किती पाणी प्यावे ?

तज्ञांनी पुरेसे पाणी पिण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं सांगितली आहेत, त्यानुसार निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज सरासरी 9 ते 13 कप पाणी प्यावे.

जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम :

१) हायपोनाट्रेमिया –

वर नमूद केल्याप्रमाणे, जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडिअमची पातळी कमी होऊ शकते. या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात. हृदय आणि मूत्रपिंडाची समस्या असलेल्या लोकांना हायपोनेट्रेमियाचा धोका जास्त असतो असे म्हटले जाते.

२) मसल क्रॅम्प –

एका अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडिअम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स पातळ होतात, ज्यामुळे शरीरातील सोडिअमची स्थिती कमी होते. शरीरात सोडिअमची पातळी कमी झाल्यामुळे मसल क्रॅम्पसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

३) वारंवार लघवी लागणे –

जास्त पाणी सेवन केल्याने जास्त लघवी होते; याचा अर्थ, जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिता तेव्हा किडनी सतत काम करते. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते आणि पाण्याचे असंतुलन निर्माण होते. तसेच, वारंवार लघवी केल्याने आपल्या किडनीवर ताण पडतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे .

४) यकृतावर परिणाम होतो –

पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे यकृतावर नकारात्मक परिणाम करू शकते. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी शरीराला लोहाची आवश्यकता असते. आपल्याला सामान्यतः अन्नातून लोह मिळते जे शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते. मात्र, हे पाण्याच्या अगदी उलट आहे. शरीर पाण्यातील लोह सहजपणे शोषू शकत नाही, ज्यामुळे यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो.

५) डायरिया –

ओव्हरहायड्रेशनमुळे हायपोकॅलिमिया म्हणजेच शरीरातील पोटॅशिअची पातळी कमी होते. यामुळे अतिसार आणि दीर्घकाळ घाम येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. एका अहवालानुसार, हायपोकॅलिमिया अनेकदा आपल्या पचनसंस्थेवर थेट परिणाम करते, ज्यामुळे उलट्या आणि जुलाबांचा त्रास होतो.

( यामध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button