महाराष्ट्रात ई-चलानऐवजी ‘ई-एल टेम’ योजना लागू करा; मुंबई रिक्षा मेन्स युनियनची मागणी

मुंबई : ई-चलान पद्धतीने सर्वाधिक त्रास विधवांना होतो. पतीच्या निधनांनंतर भाड्याने रिक्षा दिल्यास चालकाच्या चुकींमुळे ई-चलानचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
यासंदर्भातील अनेक तक्रारी युनियनकडे प्राप्त झाल्या असून, राज्य सरकारने ई-चलानऐवजी ‘ई-एलटेम’ योजना आणल्यास, जो वाहतूक नियमांचा भंग करेल, त्याला दंड करणे सोपे होणार आहे. त्याशिवाय रिक्षाचालकांना केलेल्या ई-चलान रकमेतील २० ते ३० टक्के रक्कम घेऊन कर्नाटक सरकारप्रमाणे तडजोडअंती दंड माफ करण्याची मागणी मुंबई रिक्षा मेन्स युनियनने पोलिस विभागाकडे केली आहे.
मुंबईत सर्वाधिक रिक्षा भाडेतत्त्वावर चालवण्यास दिल्या जातात. त्यामध्येही पतीच्या निधनानंतर रिक्षा भाड्याने देऊन उदरनिर्वाह करणारी कुटुंबे अनेक आहेत; मात्र कळत- नकळत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांमुळे मालकांना ई-चलानचा भुर्दंड भरावा लागतो. त्यामुळे मुंबई ई-एलटेमची योजना आणल्यास वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांचे परवाने जप्त करून त्याला तात्पुरते परवाने देण्याची आधीची पद्धत आता पुन्हा सुरू करणे शक्य आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस विभागाने वाहतूक नियमांच्या दंडाच्या कारवाईत अनेक बदल करण्याची गरज असल्याचे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी सांगितले.


