‘अहमदनगर ते अहिल्यानगर’; असा आहे नगरच्या नामांतराचा इतिहास

अहमदनगर: अहमदनगर या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अहमद निजामशहाने हे शहर वसवले आणि ते निजामशाहीची राजधानी बनले. त्याची तुलना कैरो व बगदाद या शहराच्या श्रीमंतीशी केली जायची. पुढे ब्रिटिशांनी १८२२ साली या जिल्ह्याची निर्मिती केली. त्यात सोलापूर आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश होता. कालांतराने विभाजन होऊन एकटा नगरच राहिला. आता या जिल्ह्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे.
अहमदनगर शहराच्या नामांतर आणि विभाजनाचा मुद्दा गेल्या काही दशकांपासून गाजत आहे. अगोदर विभाजन आणि मगच नामांतर अशीही भूूमिका राजकीय नेत्यांनी घेतली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव तर अहमदनगरचे अंबिकानगर करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून याच नावाची चर्चा होत राहिली.
मराठा सेवा संघाने १९९८ साली अधिवेशन घेतले. त्यांनी छत्रपती शहाजीराजेंनी निजामशाहीत गाजवलेल्या कर्तृत्वाचा आणि स्वराज्याच्या मुहूर्तमेढीचा विचार करून त्यांचे नाव या जिल्ह्याला देण्याची घोषणा केली होती. नंतर ही मागणी मागे पडली. ठराविक कालखंडानंतर विभाजन आणि नामांतराचे मुद्दे अधूनमधून चर्चेत येत राहिले. उत्तर आणि दक्षिण सरळ सरळ विभागणी झालीय. परंतु त्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालेले नाही.
राज्यात शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नामांतराच्या मुद्द्यांनी उचल खाल्ली. अंबिकानगरपाठोपाठ सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली. सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांनी फरार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्येच अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. याच कारणाने त्यांचे नाव देण्याचा मुद्दा गाजत राहिला. यासाठी आंदोलनेही झाली. नगर शहरात प. पू. आनंदऋषीजींची समाधी असल्याने त्यांचे नाव देण्याची मागणी होत राहिली. काही
पुरोगामी संघटना निजामशहा हा सहिष्णु होता. मराठा साम्राज्यासाठी हीच भूमी पूरक ठरली. त्यामुळे अहमदनगरच नाव कायम रहावे अशी भूमिका घेतली होती. सुफी संत शहा-शरीफ यांच्या नावाबाबतही काही संघटना पुढे आल्या होत्या. परंतु आता सरकारच्या घोषणेमुळे हा सर्व इतिहास झाला आहे.
काय आहे इतिहास
निजामशाहीची निर्मिती निजाम अहमदने केली. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीला हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे. २८ मे १४९० रोजी शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की, याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची.
स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवाजी राजांचे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले.
अहिल्यादेवींचे जन्मस्थळ
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे या गावचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या सून होत.
त्यांच्यानंतर अहिल्यादेवी यांनी मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून २८ वर्षे राज्यकारभार सांभाळला. त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारली. या कर्तृत्वाचा विचार करून सरकारने अहिल्यादेवींचे या जिल्ह्याला नाव देण्याचे जाहीर केले.


