Uncategorized

ठाण्यातील ३० वर्षीय विवाहितेची आत्महत्या; शवविच्छेदन अहवालानंतर उलगडणार मृत्यूचं खरं कारण…

ठाणे : ठाण्यातील चिरागनगर बौद्ध विहार जवळील एका चाळीत एका ३० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वर्तक नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाण्यातील बौद्ध विहार जवळ असलेल्या साईकृपा चाळीतील एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली.

माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी अग्निशमन दलाचे जवानांनाही पाचारण करण्यात आले होते. सारिका अमित चव्हाण (३०) असे आत्महत्या करणाऱ्या मयत महिलेचे नाव असून ती पती अमित चव्हाण याच्यासोबत साईकृपा चाळ येथे भाड्याच्या रूममध्ये राहत होती. ही रूम सुनीता तावडे यांच्या मालकीची आहे. सदर महिलेचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी उतरवून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिला.अद्याप महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. वर्तकनगर पोलिसांनी या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या ठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांच्या तपासाला नवीन दिशा मिळू शकते. सदर महिलेच्या मृत्यूची नोंद वर्तकनगर पोलिसांनी करून घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेने आत्महत्या का केली याबाबत पोलीस स्थानिकांचा जबाब नोंदवण्याचे काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button