मनोरंजन 

महेश मांजरेकर बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना का घेतात? घ्या जाणून…

मुंबई : मराठमोळे चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतीच त्यांनी त्यांचे मित्र आणि अभिनेते शिवाजी साटम यांच्याबरोबर ‘कोण होणार करोडपती’ या रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. होस्ट सचिन खेडेकर यांच्यासह या दोन पाहुण्यांनी इंडस्ट्रीतील कामाबद्दलही चर्चा केली. सचिन खेडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची महेश मांजरेकर यांनी दिलखुलासपणे उत्तरंही दिली.

महेश मांजरेकर त्यांच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना का घेतात? असा प्रश्न सचिन खेडेकर यांनी विचारला. याचं उत्तर देताना महेश म्हणाले, “मराठी कलाकारांमध्ये कॅमेर्‍यासमोर सक्षमपणे परफॉर्म करण्याची क्षमता आहे असे मला वाटते.” यावेळी त्यांनी संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या ‘वास्तव’ चित्रपटात डेढ फुट्याच्या भूमिकेसाठी अभिनेता संजय नार्वेकरला कास्ट केले होते, तेव्हाची आठवण सांगितली.

महेश पुढे म्हणाले, “काही अभिनेत्यांमध्ये काहीतरी खास आहे. मला संजय नार्वेकरला डेढ फुट्याच्या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते म्हणून मी त्याच्याकडे गेलो. लोक त्याला कास्ट करण्याच्या माझ्या निर्णयावर प्रश्न विचारू लागले, ‘त्याला कास्ट करू नका, तो चांगला दिसत नाही, भूमिकेसाठी योग्य नाही’ असंही म्हटलं गेलं. पण मी हट्टी होतो. मी ‘वास्तव’च्या टीमला एकदाच त्याचे ऑडिशन पाहायला सांगितले. जर त्यांना योग्य वाटला नाही तर न घ्यायचं ठरलं, पण त्यांनी ऑडिशन पाहिल्यावर ते म्हणाले, ‘होय! आम्ही असाच कलाकार शोधत होतो. तो परफेक्ट आहे.’”

दरम्यान, ‘वास्तव: द रिअ‍ॅलिटी’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. १९९९ साली आलेल्या या चित्रपटात संजय दत्त, नम्रता शिरोडकर आणि संजय नार्वेकर यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. यात मोहनीश बहल, परेश रावल, रीमा लागू आणि शिवाजी साटम यांच्याही सहाय्यक भूमिका होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button