जीवनशैली

मलावरोध काही कमी होत नाही तर ‘हा’ उपाय आपल्यासाठी नक्कीच लाभदायक

आरोग्य : दिवसभरातून दहा-बारा ग्लास पाणी पिऊनही लोकांचा मलावरोध काही कमी होत नाही. कसा होईल, कारण ते पाणी पित असतात, थंड वा साधे.

उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये पावसाळ्यामध्ये सहज मलविसर्जन होत नाही. प्रावृट्‌ ऋतुमध्ये (पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये) तीनही दोष विकृत असताना आणि विशेषकरुन वर्षा ऋतूमध्ये (पावसाच्या पुढच्या दोन महिन्यांमध्ये) वातप्रकोप असताना आतड्यांना येणारा कोरडेपणा मलालाही कोरडा करतो व मल सहजगत्या बाहेर पडू शकत नाही. शौचविधी सुलभ होण्यासाठी मलामध्ये पाण्याचे पर्याप्त प्रमाण असणे अपेक्षित असते, तितके पाणी मलाला मिळत नाही.

हवेतल्या गारव्यामुळे पाणी प्यावेसे वाटत नाही. कमी पाणी पिण्यामुळे मल अधिकच कोरडा होतो. त्यामुळे या दिवसांमध्ये वातप्रकृतीची माणसे, ज्यांचे शरीर (व त्यामुळे आतडीसुद्धा) जात्याच कोरडी असतात अशा व्यक्ती, बैठी कामे करणारे, ज्यांना चलनवलन होत नाही व जे व्यायाम करत नाहीत अशा सर्वांना मलावरोधाचा त्रास होतो. अशा वेळी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, जो योग्य असला तरी ते पाणी थंड असेल तर मलावरोधामध्ये उपयोगी पडेलच असे नाही, थंडी व पावसाळ्यामध्ये तर नाहीच नाही. भरपूर पाणी पिऊनही मलावरोध का होतो? याचे उत्तरसुद्धा जाणून घेऊ.

भरपूर पाणी पिऊनही मलावरोध? : एखाद्या व्यक्तीला मलावरोधाचा त्रास असला म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला सर्वसाधारणपणे दिला जातो. मात्र दिवसभरातून दहा-बारा ग्लास पाणी पिऊनही लोकांचा मलावरोध काही कमी होत नाही. कसा होईल, कारण ते पाणी पित असतात, थंड वा साधे. थंड वा साधे पाणी पिऊन मलावरोध दूर होत नाही. मात्र त्याच व्यक्तींना गरम पाण्याचा मात्र फ़ायदा होताना दिसतो. थंड पाण्याने मलाचा कडकपणा कमी होत नाही, मात्र गरम पाण्याने होतो, हे कसे? एक तर गरम पाणी (वा गरम चहा- कॉफ़ी) जठरामध्ये भरल्यानंतर, जठर आडवे होऊन ज्यावर विसावते, त्या मोठ्या आतड्याच्या आडव्या
भागालाही तो गरम स्पर्श लागतो आणि गरम स्पर्शामुळे मोठ्या आतड्यामधील मल पुढे सरकतो. या परिणामाला ‘गॅस्ट्रोकोलिक रिफ़्लेक्स’ म्हणतात.

दुसरं कारण म्हणजे प्राशन केलेले थंड पाणी हे लहान आतड्यांकडून अधिक वेगाने शोषले जात असावे, जे त्वरित मूत्रपिंडांकडे पोहोचून लघवीचे प्रमाण वाढवते, मात्र मल नरम करण्यासाठी उपयोगी पडत नाही. तुम्ही नीट निरिक्षण केले तर लक्षात येईल की गार पाणी पिणारे वारंवार मूत्रविसर्जनाला धावत असतात, मात्र सहसा त्यांची मलावरोधाची तक्रार काही त्या पाण्याने कमी होत नाही. याउलट गरम पाणी लहान आतड्यांकडून कमी प्रमाणात शोषले गेल्याने मोठ्या आतड्यांपर्यंत पोहोचून मलाला मृदु करण्यास साहाय्य करते. हा अनुभव प्रत्यक्षसिद्धही आहे.थंड पाणी पिऊनही मलावरोध कमी होत नसेल तर गरम पाणी प्यायल्याने निश्चीत फ़ायदा होताना दिसतो.

मग पावसाळ्यात पोट साफ़ करायचे कसे? : पावसाळ्यात मल कडक येतच असेल तरी रेचक औषधांच्या नादी लागू नये. कारण बाजारामध्ये उपलब्ध असणारी सर्वसाधारण औषधे ही आतड्यामधील नैसर्गिक स्रावांना सुकवून आतड्यांना अधिकच कोरडेपणा आणतात, ज्यामुळे मलावरोध आणखी वाढेल. हा कोरडेपणा संपूर्ण शरीरामधील वाताचा कोरडेपणा वाढवून, पावसाळ्यातला वातप्रकोप वाढवण्यासही कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे अशा बाजारू औषधांपासून दूर राहाणे हिताचे.

पावसाळ्यामधील वातप्रकोपाचा विचार करता आतड्याला रूक्षत्व येऊ न देता मलावरोध दूर करणारे उत्तम औषध म्हणजे एरंडेल तेल. अगदी अल्प मात्रेमध्ये एरंडेल तेल भाकरी-चपातीच्या कणकेमध्ये मिसळल्यास त्याचा सर्वांनाच फ़ायदा होतो. व्यक्तिगत उपयोग करायचा असेल तर सकाळी अर्धा ते एक चमचा एरंडेल तेल गरम पाण्यामधून वा ताकामधून प्यावे. एरंडेलाचा गंध सहन होत नसल्यास एरंडेल तेलाच्या सॉफ़्ट्युल्स (तेल भरलेल्या कॅप्स्युल्स) सुद्धा आता उपलब्ध आहेत. एरंडेल तेलामध्ये बाळहरडे भाजून कुटून तयार केलेले गंधर्वहरीतकी चूर्ण हेसुद्धा अतिशय उपयुक्त व बिनधोक असे औषध
आहे. आपापल्या कोठ्यानुसार अर्धा ते दोन चमचे चूर्ण सोसेल इतपत गरम पाण्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास सकाळी शौचास साफ़ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button