आरटीओची वाहनांवर “माझी माती माझा देश” संदेश लिहून जनजागृती

नवी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, राज्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम होत आहे. राज्यात व देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने राज्य परिवहन विभागाने आरटीओला ही त्या त्या विभागात हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअंतर्गत वाशी आरटीओकडून विभागात पासिंग करिता येणाऱ्या राज्य परिवहन बस, रीक्षा, ट्रक्स अशा वाहनांवर ‘मेरी माटी मेरा देश’ लिहून जनजागृती करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाचा उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ‘मेरी माटी, मेरा देश’ या एका नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत अमृत सरोवर / जल स्रोताशेजारी शिलाफलकम उभारणी, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरोंका नमन व, ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योद्धांच्या समर्पणाचे स्मरण करणे या करीता विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. त्यानुसार आरटीओकडून गुरुवारपासून पासिंगकरिता येणाऱ्या बस, रिक्षा, ट्रक्स अशा वाहनांवर ‘मेरी माटी मेरा देश’ संदेश प्रसारित करण्यात येत आहे.



