बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण विराट कोहलीचा विक्रम शी बरोबरी नाही करू शकला

पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ३४२ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर नेपाळचा संपूर्ण संघ १०४ धावांत तंबूत पाठवला आणि बाबर आजमच्या संघाने २३८ धावांनी सामना जिंकला. आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विक्रम ठरला. बाबर आजम व इफ्तिखार अहमद यांच्या शतकांनंतर शादाब खान, शाहिन आफ्रिदी व हॅरिस रौप यांनी दुबळ्या नेपाळची शिकार केली. एवढं सगळं करूनही भारताचा अन् विराट कोहलीचा मोठा विक्रम त्यांना मोडता आला नाही.
बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले. रिझवान ( ४४) सोबत चांगली भागीदारी करणाऱ्या बाबरने १३१ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५१ धावा केल्या. इफ्तिखार ७१ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला अन् पाकिस्तानने ६ बाद ३४२ धावा चोपल्या. शाहिन शाह आफ्रिदीने ( २-२७) पहिल्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर, हॅरिस रौफ ( २-१६) व शादाब खान ( ६.४-०-२७-४) यांनी पुढील सूत्रं हाती घेतली आणि मॅच जिंकून दिली. सोमपाल कामी ( २८) व आरिफ शेख ( २६) यांचा अपवाद वगळता नेपाळचे फलंदाज अपयशी ठरले.
आशिया चषक स्पर्धेतील हा दुसरा मोठा विजय ठरला. भारताने २००८मध्ये हाँगकाँगविरुद्ध २५६ धावांनी विजय मिळवला होता, त्यानंतर पाकिस्तानचा ( २३८ धावा वि नेपाळ, २०२३) विक्रम असेल. २००० मध्ये पाकिस्तानने २३३ धावांनी बांगलादेशला नमवले होते. आशिया चषकात १५०+ धावा करणारा बाबर पहिला कर्णधार ठरला असला तरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा चोपल्या होत्या.



