मनोरंजन 

‘ताली’ मध्ये एवढे मराठी कलाकार याबाबत रवी जाधव यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : लोकप्रिय मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या कामाने प्रेक्षकांना नेहमीच अचंबित केलंय. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. आता त्यांनी आपला मोर्चा हिंदीकडे वळवला आहे. त्यांची ‘ताली’ ही वेबसीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. ट्रान्सजेंडर आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ही वेबसीरिज फक्त भारतातच नाही तर परदेशातही गाजतेय. अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या अभिनयाचं तर कौतुक होत आहेच पण त्यासोबतच गाजतायत ते तालीमधले मराठी कलाकार. ‘ताली’ मध्ये ऐश्वर्या नारकर, नंदू माधव, हेमांगी कवी, सुव्रत जोशी, कृतिका देव यांसारख्या मराठी कलाकारांची फळी आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवी जाधव यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

‘ताली’ मध्ये एवढे मराठी कलाकार का आहेत याबद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, ‘ज्यावेळी ‘सामना’ सिनेमा पाहायचो तेव्हा श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जी जुगलबंदी व्हायची ती पाहायला फार मजा यायची. जेव्हा असे मोठे अभिनयात टक्कर देणारे कलाकार समोर असतात तेव्हा ती कलाकृती उत्तम होते. आता या भूमिकेसाठी सुष्मिता फायनल झाली होती. मग सुष्मितासमोर अशी कोण माणसं आपण आणली पाहिजेत की तिला काम करायला मजा येईल, तिच्या समोरचा कलाकार जेव्हा त्या आत्मीयतेने काम करेल तेव्हा तीसुद्धा तेवढा जीव लावून काम करेल. तिच्या तोडीस तोड अभिनय करणारे कलाकार असणं गरजेचं होतं.’

पुढे बोलताना रवी जाधव म्हणाले, ‘आणि मराठी कलाकारांचं कसं असतं की ते असे मोठ्या ठिकाणी किंवा वेगळ्या वातावरणात गेल्यावर थोडेसे बुजून जातात पण जेव्हा कॅमेरा सुरू होतो तेव्हा त्यांच्यासारखं कुणीच नाही. सगळ्यांना मागे टाकतात ते अभिनयात. त्यामुळे हे दिग्गज कलाकार घेतले आणि त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक सीन नंतर सुष्मिता मला येऊन सांगायची की काय कास्टिंग केलीये सर तुम्ही. जबरदस्त. त्या कलाकारांनाही ती जाऊन सांगायची. त्यांचं कौतुक करायची. म्हणून ‘ताली’ मध्ये मराठी कलाकार आहेत.’ यासोबतच या मुलाखतीत त्यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास उलगडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button