महाराष्ट्र

“आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही…”; मनोज जरांगेंनी घेतली ठाम भूमिका

जालना :  मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज (१४ सप्टेंबर) १७ वा दिवस आहे. मात्र, अद्याप मराठा आंदोलकांच्या मागणीवर अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून जालन्याला निघाले आहेत. ते जालन्यात मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, “समाजासमोर जे विषय ठरले होते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी समाजाला प्रबोधन केलं, तर समाजात चांगला संदेश जातो. समाजाचा आत्मविश्वास वाढतो. फक्त यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची मागणी केली.”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला येत आहेत. आता आरक्षण मिळेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. एवढं उत्तर माझ्याकडे आहे,” असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांबरोबर बंद खोलीत चर्चा करणार नाही, तर माध्यमांसमोरच चर्चा करणार आहे. सगळं समाजाच्या समोरच घडणार आहे. समाज ही चर्चा प्रत्यक्ष बघेल.”

“उपोषणाला १७ दिवसांनंतर यश आलं असं आत्ताच म्हणता येणार नाही. जेव्हा सरकार समाजाच्या हातात पत्र देईल त्या दिवशी हा लढा यशस्वी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते धाडसी निर्णय घेतात. त्या विश्वासानेच आम्ही बोलत आहोत,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button