महाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवात पाचव्या दिवशी ८० हजारांहून अधिक गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन

मुंबई : यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे पाचव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली आहे. रविवारी पहाटेपर्यंत संपूर्ण मुंबईत तब्बल ८० हजारांहून अधिक गौरी व गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी ३२ हजार मूर्तींचे म्हणजे ४० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. मुंबईत दरवर्षी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशी या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन होत असते. यावर्षी गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आले. त्यामुळे शनिवारी मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावतही मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. यंदा मुंबईमध्ये ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे. तसेच विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी पालिका गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करीत असते. मात्र कृत्रिम तलावांना गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. टाळेबंदी व करोनाच्या काळात मात्र कृत्रिम तलावातच विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्याही मुंबईत वाढवण्यात आली होती व त्यामध्ये मोठ्या संख्येने मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

यंदाही पालिकेने मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पर्यावरणाचा विचार करता गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत एकूण ८०,९६९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ७१,८२१ घरगुती गणेशमूर्ती, ७७३८ गौरी तर १४१० सार्वजनिक गणपतींचेही विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात ३२,५०९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात २९,६२० घरगुती, २३०८ गौरी तर ५८१ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button