मीरा-भाईंदरमधील दोन्ही आमदारांचा विकासकामांचा देखावा; भूमिपूजने ५०, प्रत्यक्ष कामे तीनच

भाईंदर : मीरा-भाईदर शहरातील सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांनी गेल्या वर्षभरात गाजावाजा करत भूमिपूजन केलेली तसेच काही घोषणांच्या पातळीवर असलेली सुमारे ४७ कामे प्रत्यक्षात सुरूच झालेली नसल्याचे समोर आले आहे. काही कामांसाठी मंजूर निधी प्रत्यक्षात मिळालाच नाही. बहुसंख्य कामे तांत्रिक कारणांमुळे रखडली आहेत. यापैकी काही कामांचे भूमिपूजन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. शासनाकडून तीन हजार कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात १७९ कोटी रुपयांचा निधीच आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने महापालिकेला ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. वेगवेगळय़ा बैठकांमधून तसेच आमदारांच्या पाठपुराव्यानंतर याबाबत घोषणा झाली आहे. या निधीतून आमदार गीता जैन यांनी ३१ आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी १९ कामे सुचवून विविध कामांच्या भूमिपूजनांचा मध्यंतरी धडाका लावला होता. अनेक कामांच्या घोषणा करून तसेच २० कामांचे भूमिपूजनाचे सोहळेही मोठय़ा जोशात उरकण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाणारे तत्कालीन आयुक्त विकास ढोले यांच्या कार्यकाळात हे सोहळे आयोजित करण्यात आले होते. यातील काही कामांसाठी तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. असे असले तरी या ५० पैकी ४७ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
आम्ही शहराच्या विकासासाठी या कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. मधल्या काळात ही कामे करण्यासाठी महापालिकेपुढे काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. या सर्व अडचणी दूर झाल्या असून लवकरच ही कामे केली जाणार आहेत, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले. तर, ही रखडलेली कामे लवकर मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून शहरात सर्वच विकास कामे करण्यात येणार आहेत. सध्या प्राधान्य असलेल्या कामांच्या परवानग्या आणि तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यात येत आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले. शासनाकडून मंजूर झालेल्या ३ हजार कोटीपैकी आतापर्यंत १७९ कोटी रुपये महापालिकेला वर्ग झाले असल्याचे लेखापरीक्षण विभागाने सांगितले.
आमदारांनी भूमिपूजन केलेल्या कामांमध्ये नवीन रस्ते, उद्याने, तरण तलाव, नवीन मुख्यालय इमारत, रुग्णालय, खाडी किनाऱ्याचा विकास, व्यायाम शाळा, समाजभवन, तिरंदाजी केंद्र, जेटी, अभ्यासिका, सुशोभीकरण आदी विविध कामांचा समावेश आहे. अनेक कामांना प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. तर जागेची अडचण, परवानग्या आदी तांत्रिक कारणांमुळे इतर कामे रखडली आहेत. आयुक्तांनी अनावश्यक खर्चाला सध्या स्थगिती दिल्याने काही कामे खोळंबली आहेत.


