मासिक पाळी आणि मानसिक समस्या

आरोग्य : मासिक पाळी सुरू होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. शरीरातल्या अन्तस्रावांमध्ये होणाऱ्या बदलांबरोबर मुलींमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. मासिक पाळी सुरू होणे म्हणजे प्रजननक्षमता निर्माण होणे; तसेच शरीरात होणाऱ्या बदलांमुळे स्त्रीत्त्वाची भावना मनात निर्माण होऊ लागणे. या सगळ्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नसेल, माहितीअभावी मनात गैरसमज असतील, तर हा कालावधी काही मुलींसाठी ताणतणाव निर्माण करणारा ठरतो. घरातली एखादी ज्येष्ठ स्त्री मनातल्या शंकांचे निरसन करायला, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करायला जर उपलब्ध असेल तर मासिक पाळी सुरू होण्याचा काळ सुकर होतो. हल्ली शाळांमध्येसुद्धा लैंगिक शिक्षण दिले जाते, ज्याचा चांगला उपयोग होतो. पण कधी कधी पाळी नियमित येत नाही किंवा पाळीच्या आगेमागे अनेक मानसिक लक्षणे दिसून येतात.
अनेक किशोरवयीन मुली, महाविद्यालयीन मुली पाळीविषयी तक्रार घेऊन येतात. २-३ महिने पाळी आलीच नाही, किंवा नक्की किती दिवसांनी पाळी येते हे सांगणे कठीण आहे, कारण त्यात अजिबातच नियमितता नाही अशी मुख्य तक्रार असते. त्याबरोबरच चेहऱ्यावर, ओठांच्यावर लव(केस) जास्त प्रमाणात दिसू लागतात, मुरुमांचा त्रास होतो, स्थूलपणा येतो. तपासण्या केल्यावर लक्षात येते, की दर महिन्याला अंडाशयात बीज निर्माण केले जात नाही आहे, तसेच अनेक द्रवाने भारलेल फुगवटे अंडाशयात तयार झाले आहेत. स्त्रियांच्या अंतःस्रावांचे प्रमाण कमी तर पुरुषी अंतःस्रावांचे प्रमाण जास्त आढळते. या सगळ्याबरोबरच अनेक मानसिक समस्याही निर्माण होतात. PCOD असलेल्या अनेक मुलींमध्ये डिप्रेशन आणि चिंतेचा विकार आढळून येतो.
अंतःस्रावांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे (विशेषतः testosterone च्या वाढलेल्या प्रमाणामुळे) नैराश्य येतं. याचबरोबर त्या मुलीच्या मनातली तिची प्रतिमाही ढासळते. स्थूलपणा, मुरुमे, चेहऱ्यावर केस असणे या सगळ्यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होतो. याच वयात सौंदर्याच्याही संकल्पना मनामनात तयार होत असतात, त्या संकल्पनेशी मिळते जुळते आपण नाही असे वाटून मनात निराश वाटते. जवळजवळ १३-१५% मुलींना नैराश्य येते. तर चिंतेच्या विकाराचे प्रमाण जवळजवळ ४०% किशोरवयीन मुली आणि तरुणी यांच्यात आढळते. तरुणींमध्ये विशेषतः PCOD हे वंध्यत्त्व येण्याचे कारण बनते, त्यामुळे मनातली भीती आणि चिंता वाढते.
या दोन मानसिक विकारांबरोबर काही वेळेस अतिशय कमी खाणे, अति खाणे किंवा खाण्यापिण्यावर नियंत्रण नसणे आणि आपल्या शरीराची मनातली प्रतिमा चांगली नसते. अशा सगळ्या मानसिक विकारांमध्ये वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे, व्यायाम करणे असे जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतात. वैचारिक मानसोपचाराचा चांगला उपयोग होतो. गरजेनुसार नैराश्याकरता गोळ्या दिल्या जातात आणि Hormone therapy सुद्धा वापरली जाते. सर्वात महत्त्वाचे असते, मानसिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि वेळेवर उपाय करणे!.
मीनलला आज सकाळपासून फार अस्वस्थ वाटत होते. कॉलेजमध्येसुद्धा नुसती चिडचिड सुरू होती तिची. एका मुलीशी भांडणच झाले तिचे. मग मात्र सारखे रडू येऊ लागले आणि शेवटी लेक्चर सोडून ती घरी आली. दुसऱ्या दिवशी तर तिला कॉलेजला जावेसेच वाटेना. अंगात काही ताकदच नाही असे वाटत होते. झोप येत होती. सगळ्या जगाचा राग आला होता आणि वाटत होते भविष्यात काही चांगले होणारच नाही. परीक्षेचे अचानक टेन्शन आले, वाटले आपल्याला काही जमणार नाही. त्या दिवशी मीनल कॉलेजला गेलीच नाही. दुपारी पाळी सुरू झाली. त्याच्यानंतरच्या दोन दिवसात मीनलला बरे वाटू लागले, उत्साह परत आला आणि ती पुन्हा अभ्यासाला लागली.
तिच्या लक्षात आले, की दर महिन्यालाच असे होते. खूप वेळा ती कॉलेजला जाई, पण कधी कधी दांडी मारे. प्रत्येक महिन्यात पाळी ज्या दिवशी येणार त्याच्या आधीच्या ८-१० दिवसांच्या काळात आपली मनःस्थिती अशीच होते, अतिशय संवेदनशील, हळवी, मूड तर सारखा बदलणारा; कधी एकदम निराश आणि उदास तर काही वेळाने अचानक खूष! पाळी सुरू झाल्यावर २ दिवसात एकदम छान वाटते, पुन्हा नेहमीसारखे नॉर्मल.
Premenstrual Dysphoria म्हणजे पाळीच्या आधीच्या काही दिवसांमधली अस्वस्थ अशी मनःस्थिती! जवळजवळ ८०% मुलींना थोड्याफार प्रमाणात मूड वरखाली होणे, चीड चीड होणे अशी लक्षणे दिसून येतात. पण या लक्षणांचा दैनंदिन जीवनावर काही परिणाम होत नाही आणि अगदी तात्पुरत्या प्रमाणात असल्याने मुली ही मनःस्थिती सहन करतात. पण जवळजवळ १०-१२% मुलींमध्ये/ महिलांमध्ये ही लक्षणे तीव्र स्वरूपात असतात आणि त्यांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. नैराश्य, क्वचित प्रसंगी आत्महत्त्येचे विचार, राग, चिडचिड, लक्ष केंद्रित न करता येणे, थकवा, निरुत्साह, अतिखाणे, झोप कमी किंवा जास्त होणे, अशी अनेक मानसिक लक्षणे यात दिसून येतात. त्याचबरोबर पोट फुगल्यासारखे वाटणे, शरीराला सूज, वजन वाढणे, डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे अशी अनेक शारीरिक लक्षणे सुद्धा दिसून येतात. ‘हे काय तात्पुरते आहे, नेहमीचेच आहे, आपोआप जाईल’ असे न म्हणता योग्य उपाय केले तर फार उपयोग होतो. आहारावर नियंत्रण, वैचारिक मानसोपचार, तेवढ्याच दिवसांपुरत्या नैराश्याच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या (oral contraceptives) या सगळ्याचा चांगला उपयोग होतो आणि त्या तरुण मुलीचे आयुष्य सुकर होते.
पाळी येणे ही मुलीच्या वाढीतील नैसर्गिक गोष्ट आहे. त्यातील काही अनियमिततांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये मानसिक समस्यांचा समावेश आवर्जून करावा लागतो. त्यांचे निदान आणि उपाय महत्त्वाचे ठरतात.



