‘वेळ दिला, पुरावे दिले तरी आरक्षण नाही; जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही

मुंबई : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज या उपोषणाचा तिसदा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले असतानाही मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच सरकारकडे वेळ आहे, पुरावे आहेत, तरी आरक्षण देत नाहीत. कुणाला विचारून समितीला वेळ वाढवून दिला. आता आम्हाला समिती मान्य नाही, असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
“काल पंतप्रधानांनी मराठा आरक्षणाचा कोणताही विषय घेतला नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना सांगितले नाही. जर सांगितले असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय त्यांच्या बोलण्यात घेतला नाही अशी शंका मराठा समाजामध्ये आहे. पंतप्रधानांना आता गोरगरिबांची गरज राहिली नाही असा अर्थ त्यातून काढण्यात येत आहे. मराठा समाजाला वाटलं होतं पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि सरकारला यातून मार्ग काढण्यास सांगतील. कारण मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांविषयी पाप नव्हतं. जर वाईट भावना असती तर त्यांचे विमानसुद्धा उतरू दिले नसते. सरकारने ५० वर्षे देता असं सांगायला पाहिजे होतं. कारण सरकारला वाटतं की गोरगरिब मराठ्यांचे चांगले होऊ नये. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोठं षडयंत्र रचलं आहे, असा गंभीर आरोपी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.


