पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मराठा आंदोलनाला पाठिंबा; पाळला कडकडीत बंद

पुणे : मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे.मात्र अद्याप ही राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेताना दिसत आहे.त्यामुळे राज्यातील अनेक भागात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.त्याच दरम्यान आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कडकडीत बंद आणि लाक्षणिक उपोषण करीत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाला बसले.त्याच दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे.त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.या सर्व घडामोडी दरम्यान काल पुण्यातील नवले ब्रीज येथील राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदविला.यामुळे जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
त्या सर्व घडामोडी दरम्यान आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कडकडीत बंद आणि लाक्षणिक उपोषण करीत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे. तर या लाक्षणिक उपोषणा बाबत संतोष नांगरे म्हणाले की, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून भाजीपाला,फळे,फुले यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.यातून जवळपास १४ ते १५ कोटींची उलाढाल होत असते.मात्र मागील आठ दिवसापासुन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे. तरी देखील राज्य सरकार मार्फत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही.त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्याचा निर्णय घेऊन लाक्षणिक उपोषण देखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की,मराठा समजाच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.


