महाराष्ट्रमुंबई

मुंबई, ठाण्यात फटाके नियमभंगप्रकरणी दीड हजारहून अधिक गुन्हे दाखल

मुंबई : हवा प्रदूषण नियंत्रणासाठी फटाके वाजविण्यावर उच्च न्यायालयाने घातलेल्या वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई महानगर प्रदेशात पाच दिवसांत सुमारे दीड हजार बेशिस्त फटाकेबाजांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात हवेचा दर्जा घसरला असून, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने फटाक्यांसाठी रात्री आठ ते दहा, अशी वेळमर्यादा निश्चित केली होती. मात्र, दिवाळीच्या दिवसांत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र सर्वत्र दिसले. रात्री आठच्या आधी आणि दहाच्या नंतरही अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.

गेल्या पाच दिवसांत नियम उल्लंघनप्रकरणी मुंबईत एक हजारहून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील बहुसंख्य गुन्हे फटाक्यांसाठीच्या वेळमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी १०, ११ आणि १२ नोव्हेंबर या तीन दिवसांत ७८४ गुन्हे दाखल केले. याप्रकरणी ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांत आणखी सुमारे साडेतीनशे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात फटाके विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्येही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३०० हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

रात्री १० नंतर पोलिसांची पथके ठाणे शहरात गस्त घालत असून, वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाकडेही तक्रारी प्राप्त होत आहे. पालिकेकडील या तक्रारीनुसार पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत. काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. बेकायदा फटाकेविक्री करणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल केले जात आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४९ जणांवर उल्हासनगर शहरात गुन्हे दाखल करण्यात आले. उल्हासनगर महापालिका आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत १९० बांधकामांना पालिकेने नोटीस बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे सुधारलेला हवेचा दर्जा दिवाळीच्या दिवसांत पुन्हा घसरला. पालिकेने कारवाई करून अनेक ठिकाणी बांधकामे बंद केली. मात्र, तरीही मुंबईत धुरक्याचे साम्राज्य होते. फटाक्यांमुळे हवेत धूर आणि प्रदूषके साचली होती. त्यामुळे बुधवारीही हवेचा दर्जा खालावला होता. मुंबई शहरातील कुलाबा, माझगाव, वरळी, विलेपार्ले या भागांत हवेचा दर्जा वाईट असल्याची नोंद झाली.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button