महाराष्ट्र

“दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल”, खासदार राजन विचारे

ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली या रेल्वे स्थानकादरम्यान तयार करण्यात आलेला दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा अन्यथा जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी रस्त्यावर यावे लागेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला अधिवेशनातून दिला. ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून लाखो प्रवासी नवी मुंबईत कामानिमित्ताने प्रवास करतात. कळवा, दिघा, विटावा भागातील प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे किंवा ऐरोली रेल्वे स्थानकात यावे लागते. त्यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होत असते. ही गर्दी विखुरण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिघा गाव रेल्वे स्थानक तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

डिसेंबर २०१६ मध्ये एमयुटीपी तीन प्रकल्पांतर्गत या स्थानकास मंजूरी मिळाली होती. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दिघा स्थानक तयार करणे आणि दुसऱ्या टप्प्यात कळवा ऐरोली उन्नत मार्गिका तयार केली जाणार आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यातील पहिला टप्पा म्हणजेच, दिघा गाव स्थानक तयार झालेले आहे. परंतु याठिकाणी अद्यापही रेल्वेगाड्या थांबविल्या जात नाहीत. काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी दिघा गाव स्थानक सुरू व्हावे यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेतली होती. वारंवार पत्रव्यवहार करूनही दिघा गावात रेल्वेगाड्या थांबविल्या जात नाही. स्थानिक नागरिक व तेथे येणारा नोकरदार वर्ग रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाल्याचा दावा ठाकरे गटाने गेला आहे. गुरुवारी खासदार राजन विचारे यांनी संसदेत अधिवेशनातील शून्य प्रहरावर चर्चा करून दिघा रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू असा थेट इशारा दिला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात हार्बर रेल्वे मार्गातील प्रवासी जोडले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी होवून ४० टक्के गर्दी कमी होणारा आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत येथील नोकरीनिमित्त येणारा नोकरदार वर्ग थेट नवी मुंबई मध्ये येऊ शकतात असा हा प्रकल्प असल्याचे खासदार राजन विचारे संसदेत सांगितले.

दिघा परिसरात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने नोकरी निमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाचा व स्थानिक नागरिकांचा पैसा व वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. हे रेल्वे स्थानक सुरू नसल्याने मध्य रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात जमा होणारा महसूलही घटत आहे. तसेच या परिसरात नोकरीनिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाला स्वत:च्या व इतर वाहनांचा वापर करावा लागतो. या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button