गरोदरपणात नारळपाणी प्यावे का? गैरसमज आणि महत्त्व जाणून घ्या

आरोग्य : गरोदरपणात महिलेची अवस्था नाजूक असते. अशावेळी आई आणि गर्भातील बाळाचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी पोषक आणि सात्विक आहार घेण्यास डॉक्टर सांगतात. नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण अनेकदा गरोदरपणात नारळ पाणी पिऊ नये असं सांगण्यात येते. त्यामुळं गरोदरपणात नारळ पाणी प्यावे की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला नारळ पाण्याचे महत्व आणि त्याबाबत असलेले गैरसमज याची माहिती देणार आहोत.
नारळ पाण्यात कॅलरी खूप कमी असतात. एक कप नारळ पाण्यात म्हणजेच २४० मिली नारळपाण्यात ४६ कॅलरी, ३ ग्रॅम फायबर आणि २ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळं नियमित नारळ पाण्याचे सेवन केल्यास शरीराला पोषकतत्वे मिळतात. नारळ पाणी प्यायल्यामुळं शरीराला उर्जा मिळते आणि गॅस-अॅसिडिटीसारख्या समस्यांही निर्माण होत नाहीत. नारळपाणी दररोज प्यायल्यास शरीराला कॅल्शियमचा पुरवठादेखील होतो. गरोदरपणात नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणतेही अपाय होत नाहीत.
नारळपाणी हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पेय आहे. ते शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत. गर्भधारणेदरम्यान हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण अजूनही नारळ पाणी पिण्यासंदर्भात लोकामध्ये अजूनही गैरसमज आहेत.
गरोदरपणात नारळपाणी पिण्याचे फायदे?
– नारळपाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळं जळजळ, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांवर उपायकारक असते.
– व्हिटॅमिनसीचे प्रणाण अधिक असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला यासारख्या व्हायरल आजारांपासून बचाव होतो.
– amniotic fluid म्हणजेच गर्भजल कमी असेल तर नारळपाणी प्यायल्याने गर्भजलात वाढ होते.
नारळपाण्यासंदर्भात काही गैरसमज आहेत.
– नारळपाणी प्यायल्यामुळं अॅसिडिटी होऊ शकते, असा समज आहे. मात्र त्याचा आणि नारळपाण्याशी काही संबंध नाही. अॅसिडिटी ही शरीरातील हार्मोनल बदलांमुळं होतं असते.
– नारळ पाणी पिण्याने बाळाच्या डोक्याचा आकार वाढतो, असं अजिबात नाहीये बाळाचा आकार आणि नारळ पाणी यांचा काहीच संबंध नाहीये.
– गरोदरपणात नारळाचे पाणी प्यायल्यास बाळाचा रंग गोरा होतो व केस मजबूत होतात, असा गैरसमज आहे. मात्र काहीच तथ्य नाही. बाळाचा रंग हा अनुवंशिकतेवर अवलंबून असतो.
दिवसातून किती नारळ पाणी प्यावे?
नारळपाणी कितीही पौष्टिक असले तरी अतिप्रमाणात त्याचे सेवन करणे चुकीचे आहे. कारण यात पोटॅशियम असल्यामुळं ते हृदयाची गती वाढवते. त्यामुळं दिवसभरातून १ ते २ ताजे नारळ पाणी प्यावे. त्यापेक्षा अधिक पिऊ नका. जबरदस्ती नारळाचे पाणी पिणेदेखील टाळावे.
(टीप : सदर माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या )



