RAIN: राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस गारपिटीचा फटका

नाशिक : राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
केवळ शेतकरीच नव्हे तर, या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा पशू-पक्षांनाही फटका बसतानाहा यला मिळत आहे. त्यानुसार अवकाळी पावसामुळे नाशिकमधील १०० हून अधिक पोपटांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक पोपट गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे १०० हून अधिक पोपटांचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक पोपट गंभीर जखमी झाले. पोखरी येथील एका पिंपळाच्या झाडावर पोपटांचा किलबिलाट असायचा. मात्र आता किलबिलाट पूर्णपणे थांबला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, आज संध्याकाळीही जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, सिन्नर आदी पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून सकाळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
दरम्यान, सिन्नर शहरासह तालुक्यातील डुबेरे, मनेगाव परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. पुर्व भागातील पांगरी, वावी, शहा, पंचाळे परिसरातही विजांचा कडकडाट सुरु झाला होता. त्यानंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. तसेच नांदुर शिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही काही भागात पावसाच्या सरी बसरल्या. तालुक्यातील सरदवाडी, पास्ते, जामगाव परिसरात जोरदार पावसासह गारा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सरदवाडी, पास्ते परिसरात मुबलक पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बाग आहेत. या गारांचा फटका बागांना बसण्याची शक्यता आहे. तसेच शेतात साठवण्यात आलेल्या मालाला व चाऱ्यालाही यामुळे फटका बसला आहे. मालेगावला शहरालादेखील पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे मालेगावमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


