महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे कांदळवन क्षेत्रातील गोदामांना भीषण आग

मीरारोड : कांदळवन समितीने मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स मागील भागात अनेकदा पाहणी करून तेथील अनधिकृत भंगार, सिएनजी बाटला आदींच्या गोदामां वर कारवाई करुन गुन्हे दाखल करा अशी मागणी होऊन देखिल मीरा भाईंदर महापालिकेच्या भ्रष्ट आणि बेजबाबारपणामुळे कारवाई केली गेली नाही. परिणामी मंगळवार च्या मध्यरात्री येथील भंगार गोदाम ना भीषण आग लागली. नेमिनाथ हाईटस मागील कांदळवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा कांदळवन तोडून तेथे भराव करुन झोपड्या, गोदाम आदि विवीध धंदे थाटले आहेत. येथील झोपड्यात लोकं राहतात. ह्या बेकायदा भराव प्रकरणी काही गुन्हे दाखल केले आहेत. येथील कांदळवन मध्ये सर्रास बेकायदा भराव केला जात आहे.
या प्रकरणी स्थानिक नागरिकांसह अनेक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. येथे अनेकदा कांदळवन समितीने स्थळ पाहणी केली आहे. वेळोवेळी पाहणीत उपस्थित महापालिकेचे अधिकारी यांना सदर बेकायदा गोदामे, झोपड्या आदि हटवून गुन्हे दाखल करण्यास तसेच बेकायदा भराव बंद करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र महापालिका अधिकारी कठोर कारवाई न करता उलट बेकायदा कामांना संरक्षण देत असल्याने मंगळवारी मध्यरात्री येथील गोदामना भीषण आग लागली. बांबू ताडपत्री च्या झोपड्या गोदाम व त्यातील साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. आगी मध्ये अंदाजे १२ झोपड्या जळाल्या व भंगारचे साहित्य जळाले असे अग्निशमन दलाच्या मार्फत सांगण्यात आले. आग मोठी व भीषण होती. आगीचे उंच लोळ उसळले होते. घातक धूर सर्वत्र पसरला होता. हया आधी देखिल आग लागली होती.
ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सर्व गोदाम झोपडया कायमच्या हटवा. भराव काढून कांदळवन लागवड करा. पालिका अधिकारी यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक रुपाली श्रीवास्तव सह गो ग्रीन फाऊंडेशन चें इरबा कोनापुरे, फॉर फ्युचर इंडिया चे हर्षद ढगे, सत्यकाम फाऊंडेशन चे कृष्णा गुप्ता आदींनी केली आहे.



