गुजरात- राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन

भाईंदर : भाईंदर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भाईंदर मध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी ते आले होते. शहरातील हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय मेहता यांनी लक्षात आणून दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. मिरा-भाईंदर मुबंई लगतचे जलद गतीने विकसित होणारे शहर असून लोकसंख्या १५ लाखांचा जवळपास पोहचली आहे. शहरात गुजरात व राजस्थान मधील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना गावी जायचे असल्यास बोरिवली आणि मुबईतील रेल्वे स्थानकातून मेल गाड्या पहाटे पकडव्या लागतात.यादरम्यान नागरिकांना संबंधित रेल्वे स्थानका पर्यंत पहाटे किंवा गर्दीच्या वेळी पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रामुख्याने वयोवृद्ध ,लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागतो. रविवारी प्रचारासाठी रेल्वे मंत्र अश्वीनी वैष्णव भाईंदर येथे आले होते. शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मेहता यांनी गुजरात व राजस्थानला गुजरात सुपर फास्ट , कर्णावती एक्सप्रेस , अहमदाबाद वंदे भारत , सौराष्ट्र मेल ,जोधपुर एक्सप्रेस , सूर्यनगरी एक्सप्रेस , रणकपुर एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्या भाईंदर रेल्वे स्थानकात थांबवण्याची मागणी केली. यावर वैष्णव यांनी लवकरच गुजरात आणि राजस्थान जाणाऱ्या सर्व गाड्या भाईंदर रेल्वे स्थानकात थांबाव्यात आवश्यक कार्यवाही हाती घेणार असल्याचे सांगितले.


