महाराष्ट्र

प्रवाशांच्या असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच; समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब

पनवेल : साडेनऊ लाख लोकसंख्या असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात सुमारे अडीच लाखांहून अधिक प्रवासीवर्ग असला तरी प्रचारादरम्यान प्रवाशांच्या समस्येवर कोणताही राजकीय पक्ष बोलण्यास तयार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत निवडून येणारा उमेदवार राज्य सरकारच्या माध्यमातून पनवेलकरांसाठी प्रभावी परिवहन व्यवस्था सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करणार याबाबत प्रचारातून ‘शहर परिवहन’ चा मुद्दा हद्दपार झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तीन आसनी रिक्षाचालकांची संख्या पनवेलमध्ये सुमारे १२ हजारांहून अधिक आहे. मीटरप्रमाणे पनवेलमध्ये रिक्षा चालवाव्यात यासाठी कोणत्याही राजकीय नेत्यांनी आग्रह धरला नाही. त्याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्षाचालक हे स्थानिक आहेत. त्यामुळे तीन आसनी रिक्षांनी नियमाप्रमाणे व्यवसाय करावा हा मुद्दा उमेदवार उपस्थित करीत नाहीत.

दररोजच्या रिक्षाभाड्यातून प्रवाशांची लूट होत असली तरी असुरक्षित प्रवासाशिवाय पनवेलच्या प्रवाशांसमोर पर्याय उरलेला नाही. तीन आसनी रिक्षात पाच प्रवाशांना कोंबून रिक्षाप्रवास राजरोस सुरू आहे. या मुद्द्यावर राजकीय पक्षांचे उमेदवार आणि मतदारांकडूनही प्रश्न विचारले जात नाहीत अशी स्थिती आहे. १५ वर्षांपासून आ. प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेचे नेतृत्व राज्याच्या विधिमंडळात करत असल्याने ठाकूर यांनी पनवेल शहराची परिवहन व्यवस्था बळकट करण्यासाठी काय केले असा प्रश्न सामान्य मतदारांकडून विचारला जात आहे. सध्या पनवेलचे हजारो प्रवासी हार्बर रेल्वे तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेची बससेवा (एनएमएमटी) आणि मुंबई महापालिकेची बेस्ट तसेच राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) या सार्वजनिक बससेवेवर अवलंबून आहेत. परंतु पनवेल पालिकेची स्थापना होऊन आठ वर्षे उलटल्यानंतरही पालिकेची स्वत:ची बससेवा सुरू होऊ शकली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button