महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट कारखाने व रेडिमिक्सच्या वाहतुकीमुळे वाढले प्रदूषण

वसई : वसईत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत व शहरात रेडिमिक्स सिमेंट कारखाने उभारले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळले जात नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम हा नागरी आरोग्यावर होऊ लागला आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. याशिवाय विकासाची कामे ही या भागात वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीच्या रेडिमिक्सच्या मालाची मागणी ही वाढली आहे. याच अनुषंगाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी रेडिमिक्स सिमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कारखान्यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. मात्र हे प्रकल्प मालक पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळत नाहीत. याशिवाय प्रदूषण रोखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याने या कारखान्यातून सतत धुळीचे प्रदूषण सुरूच आहे. ही सर्व धूळ थेट महामार्गावर येत असल्याने महामार्ग सुद्धा अक्षरशः सिमेंट काँक्रिटच्या धुळीने भरलेला असतो.या धुळीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वाढत्या धूळ प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरी आरोग्यावर ही याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे.

तर दुसरीकडे या महामार्गालगतचा हिरवागार परिसर आहे.मात्र या प्रकल्पातून सतत उडणाऱ्या धुळीने येथील निसर्गरम्य परिसराची धूळधाण होऊ लागली आहे.अनेक झाडांवर हे धूलिकण बसून हिरवी झाडे ही धुळीने भरली आहेत. तर भात शेतीचे क्षेत्र, विविध प्रकारची फळझाडे ही धुळीच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडू लागली आहेत असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.या प्रदूषणकारी प्रकल्पांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. रेडिमिक्स सिमेंट कारखाने व त्यांच्या वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले आहे. यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना प्रकल्प धारकांना केल्या आहेत. यात २० हजार चौरस मीटर बांधकाम प्रकल्प भागात कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी २ हजार चौरस मीटर राखीव जागा, ३ महिन्यांच्या आत बॉक्स सारखे आच्छादन लावणे, नवीन प्रकल्प धारक मुख्य रस्त्याच्या ५०० मीटरपासून लांब असणे आवश्यक तर शाळा, नागरि वस्ती, रुग्णालये ५०० मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्र व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत प्रकल्प उभे करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक, तसेच जे आधीपासूनच प्रकल्प आहेत त्यांना २५ लाखांची बँक हमी सादर करावी लागणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी फवारणी, वाहतुकी दरम्यान विशेष काळजी घेणे यासह विविध प्रकारच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास मग प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

महामार्गालगत सिमेंट कारखाने असल्याने आरएमसी वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करू लागली आहे. दररोज महामार्गावर आरएमसी वाहतूक करणारी वाहने सर्वाधिक विरुद्ध दिशेने प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना धडक लागून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. एकापाठोपाठ एक अशी वाहने असतात धूळ प्रदूषण इतके असते ही वाहने दिसून येत नाहीत अशा वेळी अपघात होऊ शकते असे वाहनचालकांनी सांगितले आहे. अशी धोकादायक वाहतूक करणाऱ्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रदूषण पसरविणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई सुरूच होती. आता नवीन मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पांना उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्याचा आढावा ही घेतला जाईल. दिलेल्या वेळेत जर उपाययोजना केल्या नाहीत पुढील कारवाई केली जाईल.- आनंद काठोळे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, ठाणे- पालघर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button