महाराष्ट्र

नववर्षाचे स्वागतासाठी मुंबईकरांनी धरली कोकण गोव्याची वाट, खासगी वाहतूकदारांकडून बसभाड्यात वाढ

मुंबई : सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी कोकण, गोव्याची वाट धरली. त्यामुळे मुंबईहून कोकण, गोव्याला जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतुकीचे बसभाडे गगनाला भिडले आहेत. मुंबई ते गोवा वातानुकूलित शयनयान बसचे भाडे सुमारे ५ हजारांपर्यंत वाढले. बसभाड्याचे दर वाढले असले तरीही प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे, परंतु दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांची प्रवास करताना आर्थिक कोंडी झाली आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टी येथे नववर्ष साजरा करण्याचा अनेकांचा बेत असतो. त्यामुळे रेल्वे, विमानाची तिकिटे काढली जातात, परंतु रेल्वेची तिकीट आरक्षित न झाल्याने, प्रवास करण्यास अडचण येते. तसेच मुंबई ते गोवा दरम्यानचे विमानांच्या तिकिटांचे भाडे ५ हजारांपासून ते ३२ हजारांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे विमान प्रवास करणे खर्चीक बाब असल्याने प्रवाशांनी खासगी बस गाडीला पसंती दर्शवली आहे. त्यातही वातानुकूलित शयनयान बसची निवड प्रवासी करत आहेत. वर्षाखेरीस गोव्याला जायला सर्वाधिक मागणी असते. या काळात मुंबई ते गोवा एकेरी वाहतूक होते. गोव्यातून परतणाऱ्या बहुतांश बस जवळपास रिकाम्या जातात. बरेच पर्यटक नवीन वर्ष साजरे करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे सध्या वाढीव दर आहेत. गोव्यानंतर महाबळेश्वर, लोणावळा-खंडाळा, कोकणातील किनारपट्टी, दमण, सिल्वासा या ठिकाणांवर पर्यटक जातात, असे एका खासगी वाहतूकदाराने सांगितले.

● मुंबई ते गोवा जाणाऱ्या वंदे भारत, जनशताब्दी, कोकण कन्या, तेजस यांसारख्या लोकप्रिय रेल्वेगाड्याचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवासी खासगी बसकडे वळतात. खासगी वाहतूकदारांकडून तिकीटदरात वाढ केली आहे.

● मुंबई ते गोवा इतरवेळी ८०० ते १००० रुपये तिकीट असलेल्या बसचे दर २ हजारांपासून ते ५ हजारांपर्यंत वाढले आहे.

● मुंबई ते वैभववाडी ९०० ते १००० रुपये, मुंबई ते गुहागर ६०० ते १,५०० रुपये, मुंबई ते चिपळूण ९०० ते ५००० रुपये, मुंबई ते सावंतवाडी ९०० ते ३,५०० रुपये, मुंबई ते महाबळेश्वर ५०० ते ३,७०० रुपये, मुंबई ते लोणावळा ५५० ते ३ हजार रुपये असे दर खासगी बसचे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button