राजकारण

…या कारणामुळे कॉंग्रेसचे दोन गट पडतील; बाळासाहेब थोरात यांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आता अत्यंत विकोपाला गेले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीवरून झालेला घोळ कसा आणि कोणामुळे झाला, हे समोर आणले होते. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस एच. के. पाटील यांनी तांबे कुटुंबातील कोणी निवडणूक लढवायची, याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे सांगितले होते. त्यानंतर ही जागा सत्यजित तांबे यांनी लढवावी, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, त्यांना नाशिक पदवीधरऐवजी औरंगाबाद व नागपूर येथील एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा फॉर्म दिले गेले. त्यात डॉ. सुधीर तांबे यांचे नाव लिहूनच फॉर्म पाठवले गेले, असे दावे सत्यजित तांबे यांनी पुराव्यांसह केल्यामुळे पटोले यांची मोठी पंचाईत झाली. त्यानंतर पटोले यांनी त्यांचे विश्वासू सहकारी व पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना पत्रकार परिषद घेऊन याचे उत्तर द्यायला लावले होते. यात थोरात यांचे सहकारी गुंजाळ यांनी हे फॉर्म योग्य असल्याचा दावा केल्याचे सांगत थोरात यांना लक्ष्य करण्यात आले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर थोरात आता काय करणार, याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागून राहिले होते. थोरात याबाबत अद्याप प्रसारमाध्यमांशी काहीही बोलले नसले, तरी त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून सध्याच्या प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे शक्य नसल्याचे कळवले आहे. काँग्रेस पक्षात निष्ठेने इतकी वर्षे आपण काय काय काम केले, याचाही थोडक्यात गोषवरा या पत्रात देण्यात आला आहे. थोरात यांच्या या पत्रामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार की, पटोले यांचे खांदे दिल्लीतील त्यांचे ‘गॉडफादर’ के. सी. वेणुगोपाल अधिक भक्कम करणार, यावर थोरात यांचे काँग्रेस पक्षातील भवितव्य अवलंबून आहे, असे काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

‘थोरात यांना दुखावणे योग्य नाही’

‘राज्यातील पक्षात अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात हे दोन महत्त्वाचे चेहरे आहेत. थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पक्षाची अवस्था फारशी चांगली नसताना दुखावणे योग्य नाही. पटोले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर सुरू झालेली त्यांची मनमानी संपलेलीच नाही. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छोटू भोयर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. ते उमेदवारच आयत्या वेळी पळून गेले. भोयर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट निर्देश देऊनही पटोले यांनी पक्षश्रेष्ठींचे म्हणणे मान्य केले नव्हते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना नाराज करून काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याच्या भ्रमात पटोले असले, तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी हे कसे काय चालवून घेतात, हाच खरा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अस्तित्वासमोरील मोठा प्रश्न आहे,’  असे काँग्रेसच्या एक विदर्भातील आमदाराने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button