महाराष्ट्र

बारावीच्या निकालात मुलींनी यंदाही मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.

बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये :

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४२८१९४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१६३७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२९२४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९१.२५ आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५८७९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५५८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४४.३३ आहे.

३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांची एकूण संख्या ३६४५४ एवढी असून ३५८३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९५२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.

४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६११३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६०७२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ५६७३ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९३.४३ आहे.

६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ( ८८.१३%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९३.७३ % असून मुलांचा निकाल ८९.१४ % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ % ने जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० % आहे.

मार्च – एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के इतका होता. फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल २०२२ च्या तुलनेत या वर्षी निकाल २.९७ टक्के कमी आहे. तथापि फेब्रुवारी-मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ०.५९ टक्के वाढला आहे.

विभागनिहाय टक्केवारी :

पुणे : ९३.४४
नागपूर: ९०.३५
औरंगाबाद: ९१.८५
मुंबई :८८.१३
कोल्हापूर :९३. २८
अमरावती :९२. ७५
नाशिक :९१.६६
लातूर :९०.३७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button