विद्यार्थ्यांनाच राजदूत बनण्याची संधी! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; महाविद्यालयातून होणार तिघांची निवड

पुणे – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनाच प्रसारक बनण्याचा अनोखा उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हाती घेतला आहे. उच्च शिक्षणविषयक तरतुदी आणि शिफारशींचा प्रचार-प्रसारासाठी ‘एनईपी सारथी’ची रचना करण्यात आली आहे. देशभरातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थ्यांची सारथी म्हणून निवड केली जाणार आहे. जे विद्यार्थी राजदूत म्हणून काम करतील, असे युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोगाकडून याबाबत देशातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यास सांगितले आहे. त्याबाबतची माहिती सहा जूनपर्यंत आयोगाकडे सादर करावी लागणार आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये एनईपीच्या माध्यमातून अनेक सुधारणा होणार आहे. त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा, समानता आणि उपलब्धता यावर अधिक भर आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी यांचा एकत्रित तितकाच आवश्यक आहे.
उपक्रमाचा उद्देश :
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून उच्च शिक्षणातील विविध सुधारणांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी यूजीसीकडून एनईपी सारथी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, धोरणाचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
आवश्यक कौशल्ये :
- कोणत्याही शाखेतील तीन विद्यार्थ्यांची निवड करावी
- विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व चांगले असले पाहिजे.
- उत्कृष्ट संवाद कौशल्य, नेतृत्वगुण असे गुण आवश्यक


