लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं ‘मविआ’समोर थेट आव्हान; वादाची ‘ती’ ठिणगी वणवा पेटवणार?

आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे असून, बाजार समितीच्या निवडणुकीत पडलेली वादाची ठिणगी आगामी निवडणूका नक्कीच गाजविणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्यात भाजप- शिवसेना यांचा आता थेट महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांशी सामना रंगणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरे गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर भाजप- शिवसेना आव्हान उभे करू शकते, अशी चर्चा रंगत आहे.
जिल्ह्यातील राजकारण नेहमीच एकमेका सहाय्य करु…चे राहिलेले आहे. निवडणुकांपुरताच पक्षात, पुढाऱ्यात विरोध व निवडणूका झाल्या की, पुन्हा एकीचे सुर नेहमीच दिसून येतात. परंतु, शिवसेना फुटल्यानंतर व महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर परिस्थिती पूर्णतः बदलल्याचे चित्र आहे. आतून काहीका असेना! परंतु जिल्ह्यात देखील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना चांगलाच रंगणार असल्याचे विविध घटनांवरून दिसून येत आहे.
शिवसेना ठाकरे गट प्रबळ :
शिवसेनेच्या फुटीचा जिल्ह्यावर फारसा परिणाम झाला नाही. लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा कायम राखली. शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागा चार पक्षांकडे आहेत. त्यात परभणी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. राहुल पाटील, पाथरी विधानसभेत कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर, गंगाखेड विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. रत्नाकर गुट्टे व जिंतूर विधानसभेत भाजपच्या मेघना बोर्डीकर या प्रतिनिधित्व करतात. म्हणजे महाविकास आघाडी व महायुतीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत.
भाजपला बळ देण्याचा प्रयत्न :
सध्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्याचे दौरे वाढविले आहेत. या ठिकाणच्या भाजपला ताकद देवून लोकसभा व परभणी विधानसभेची जागा मिळविण्यासाठी भाजप तयारी करत आहे. विशेष म्हणजे भाजपने परभणी लोकसभेवर जास्त लक्ष केंद्रित केल्याचेही दिसून येते. दोन दिवसांपूर्वी दौऱ्यावर आलेले भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनीही लोकसभेसाठी पक्ष जोर लावणार असल्याचे सांगितले आहे. आधीही आलेल्या भाजप नेत्यांचे सुर ही तसेच होते. त्यातच जिल्ह्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजपच्यावतीने आढावा घेण्याचे काम करण्यात आले.
बाजार समितीतील वादाची ठिणगी पेटणार :
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्यावेळी भाजपचे बाजार समितीतील सदस्य व ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये प्रचंड वादंग झाला व वादाची ठिणगी पडली आहे. वास्तविक पाहता या बाजार समितीत महाविकास आघाडीला अपक्षांनी देखील साथ दिल्यामुळे सदस्यांची संख्या १४ झाली आहे. भाजपचे फक्त चार सदस्य आहेत. त्यामुळे हे चार सदस्य आगामी काळात समितीच्या कारभारात ठाकरे गटाच्या सदस्यांना पर्यायी लोकप्रतिनिधींना लक्ष करण्याचे काम करतील, असे चित्र निर्माण झाले आहे.
गंगाखेडमध्येही ‘तीच’ परिस्थिती :
गंगाखेड बाजार समितीत महाविकास आघाडीचे दहा तर आमदार डॉ. गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्य निवडून आले होते. परंतु, सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही सदस्यांना आपल्याकडे वळविण्यात डॉ. गुट्टे यांना यश आले. या बाजार समितीवर डॉ. गुट्टे यांनी वर्चस्व मिळवले. त्यामुळे देखील महाविकास आघाडी व भाजप व शिवसेना शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात आगामी काळात संघर्ष अटळ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे मनोमिलन :
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका महाविकास आघाडी तसेच महायुतीतील घटक पक्षांचे मनोमिलन करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. या निमित्ताने अपवाद वगळता महाविकास आघाडीत असलेल्या विविध पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे चित्र आहे. ज्यांचे फारसे सख्य नव्हते त्यांनी देखील आता जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. ही एकी कायम राहिली तर आगामी निवडणुकीत विरोधकांपुढे मोठे आव्हान निर्माण करु शकते.



