सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी; वर्ल्ड कपमध्ये ‘या’ चार टीम सेमीफायनल खेळणार

टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. त्यानंतर संघाला कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. अशातच आता यजमान भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर सर्वांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.
सौरव गांगुली याला आगामी वर्ल्ड कपमध्ये कोणते संघ सेमीफायनलमध्ये खेळतील, असा सवाल विचारला गेला. त्यावर सौरव गांगुली याने रोखठोक उत्तर देत सर्वांना बुचकाळ्यात टाकलंय. सौरव गांगुलीने ५ संघाची निवड केली. विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी गांगुलीने इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांची निवड केली आहे.
वर्ल्ड कप सेमीफायनलला कोण असेल? हे सांगणे खूप कठीण आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत हे संध निश्चित असतील, असं मला वाटतंय. या मोठ्या सामन्यांमध्ये तुम्ही न्यूझीलंडला कधीही कमी लेखू शकत नाही आणि मी पाच संघ निवडेन आणि त्यात पाकिस्तानचाही समावेश करेल, असंही गांगुली म्हणाला. त्याचं कारण देखील त्याने सांगितलंय. पाकिस्तान पात्र ठरला पाहिजे जेणेकरून भारत-पाकिस्तान उपांत्य फेरी ईडन गार्डन्सवर होऊ शकेल, असं वक्तव्य सौरव गांगुलीने केलंय.
आगामी वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन आता सुरू झालंय. ही स्पर्धा अहमदाबादमध्ये ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल, ज्याचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० संघ खेळणार आहेत. टीम इंडिया ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना खेळणार आहे.
दरम्यान, किमान टीम इंडिया डब्ल्यूटूसी फायनलसाठी तरी पात्र ठरली होती, ही देखील एक उपलब्धी आहे. आपल्याकडं मोठी संधी आहे, आपल्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे आशा आहे की आपण पुन्हा नवा पराक्रम करून दाखवू, असं देखील गांगुली म्हणाला आहे.



