भारत -विंडिज दरम्यान डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात सलग दोनदा पराभूत होणारा भारतीय संघ उद्यापासून डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात करणार आहे. भारत आणि यजमान वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विजय मिळवून नव्या हंगामाला प्रारंभ करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.
मालिकेचा पहिला कसोटी सामना डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात कऱणार आहेत. भारतीय संघ महिनाभरानंतर मैदानात उतरणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लागोपाठ दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासारख्या युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल. कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला डच्चू देण्यात आला आहे. अनुभवी अजिंक्य रहाणेच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर जवळपास एका महिन्यात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या दौऱ्याकरिता युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ९८ कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने २२ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ३० सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. ४६ सामने अनिर्णित राहिले आहेत. २००२ पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. ही घोडदौड कायम राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर विजयी मार्गावर परतण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.



