सप्तश्रृंगी घाटात बस दरीत कोसळून भीषण अपघात; अजितदादांनी दखल घेत, प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलंय. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतलीये.
नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. आज सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली.
तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु असल्याचे सांगत, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबीयांबद्दल संवेदनाही व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.


