
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे.
यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयाने दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितले आहे. दरम्यान, हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला आहे.
जून २०२० पासून १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीतला मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. यादरम्यान सरकारही बदलले. सरकार बदलल्यानंतर या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होणार, असे वाटत असतानाच राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी परत पाठवली. त्यानंतर पुन्हा एकदा या नियुक्त्यांसंदर्भात आक्षेप घेण्यात आले. सप्टेंबर २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात स्थगिती आदेश ठेवला होता.



