
नवी दिल्ली : आंदोलनात सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर २६ दिवसांनंतर आपले उपोषण सोडले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांना सूप पाजून उपोषण सोडवले. यावेळी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो याही उपस्थित होत्या. गुरुवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत नीट पेपरफुटी प्रकरणात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश दिला. त्यानंतर काही मिनिटांतच वांगचुक यांनी उपोषण समाप्त केल्याची माहिती समोर आली. उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह तसेच लडाखच्या अपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी २६ दिवसांचे उपोषण संपवले. त्यांनी नमूद केले की, यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील ६५ खासदारांनी त्यांची भेट घेतली होती किंवा उपोषण मागे घेण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रांवर स्वाक्षरी केली होती. वांगचुक यांनी पुढे म्हटले की, विविध अटींवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेदरम्यान मान्य झालेल्या अटींची सविस्तर माहिती लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, देशात कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी संयम आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यापूर्वी सरकारकडे नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या होत्या आणि सरकारकडून त्यांना कोणती आश्वासने देण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे उपोषण समाप्त होण्यामागील नेमका तोडगा काय, याबाबत समाजमाध्यमांवर विविध चर्चा सुरू झाल्या असून, वांगचुक यांच्या आगामी व्हिडिओकडे सर्वांचे लक्ष लागले आहे



