महाराष्ट्र

शिक्षण विभागाने शाळांचा निधी रोखला; झेडपीच्या ४४३ शाळांमध्ये वीज पुरवठा अभावी अंधार

पालघर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांचे वीज बिल न भरल्यामुळे शाळांची वीज जोडणी कापण्यात आली असून विद्युत या शाळांचा प्रवाह खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून ऐन पावसाळ्यात अंधारातच शिक्षण घेण्याची वेळ ओढवली आहे.

जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल हे व्यावसायिक दराने आकारले जाते. जिल्हा परिषद अंतर्गत एकूण २१३४ शाळा कार्यरत असून दर महिन्याला साधारणतः बाराशे ते पंधराशे रुपयेपर्यंत विज बिल येत असते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर असते. शाळांचे मुख्याध्यापक त्यांच्याकडे येणाऱ्या निधीतून भरत असतात. मात्र, सध्या हा निधी रोखला गेल्यामुळे अनेक शाळांना वीज बिल भरता आले नाही. २०१९ पासून ७० ते ७५ लाखांची वीज बिल थकबाकी असून यामुळे जिल्हा परिषदेच्या जवळपास ४४३ शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शाळांमध्ये विक्रमगड तालुक्यातील ५३, पालघर १३, जव्हार ९१, मोखाडा ६७, डहाणू ८०, तलासरी ६४, वाडा ६८, वसई ७ शाळांचा समावेश आहे. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऐन पावसात अंधारात आणि डासांच्या सहवासात शाळेत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक गावांमध्ये लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या गेल्या आहेत. आता या शाळांमध्ये वीज नसल्यामुळे शिक्षक शाळेत आले, तरी ऑनलाइन वर्गासाठी त्यांना मोबाइलचाच वापर करावा लागत आहे.

वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शाळेत उपलब्ध संगणक, प्रोजेक्टर अशा डिजिटल साधनांचा उपयोग सुद्धा करता येत नाही. वीज बिल थकबाकी शासकीय निधी प्राप्त न झाल्यामुळे शासन दरबारी ही माहिती असताना देखील वीज मंडळाने शाळांची वीज जोडणी तोडली आहे. या शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button