महाराष्ट्र

कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत होणार सुरू

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोगदातील सुरक्षेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. पावसाने जर का अजून दहा ते पंधरा दिवसांची उघडीप दिली तर या दोन महिन्यात केव्हाही बोगद्यातील सिंगल लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू होऊ शकते. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना ही सिंगल वाहतूक लेन या कशेडी बोगद्यातून सुरू करण्यात येऊ शकते.

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी हा अवघड वळणांचा महत्त्वाचा घाट पार करण्यासाठी तब्बल ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. या घाटात अनेकदा जीवघेणे अपघातही होतात. कशेडी बोगद्यातील सिंगल लेन सुरू झाल्यास हा वेळ केवळ दहा मिनिटे पंधरा मिनिटांवर येणार आहे. त्यामूळे कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यास पर्यटकांना चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचे कामही युद्ध पातळीवर अधिकची यंत्रणा लावून सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

२०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. डिसेंबर २०२३ पर्यंत या बोगद्याचे पूर्ण काम करून दोन्ही लेन सुरू करण्याची डेड लाईन प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बोगद्याची दोन वेळा पाहणी केली. त्यानंतर रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याची पाहणी केली होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वळणवळणाच्या घाटातून प्रवास करण्यापेक्षा या बोगद्यातून चाकरमान्यांचा सुखकर प्रवास कोकणात व्हावा यासाठी या बोगद्यातील रस्त्यावरील काँक्रेटीकरण करण्याचे काम सध्या दिवस रात्र सुरू आहे. दोन दिवसानंतर राज्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करणार आहेत. कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार झालेला बोगदा हा गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, त्यानंतरही या बोगद्याच्या परिसरातले काम संथगतीने सुरू होते संबंधित ठेकेदाराला सिमेंटचाही अपुरा पुरवठा होत होता. त्यामुळे कशेडी येथील स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडिओ करून सोशल मीडिया वर व्हायरल केला होता. आता या बोगदातील कामाला वेग आला आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगराच्या आतून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. कशेडी घाटाच्या खालील बाजूस बोगद्याची खोदाई अत्याधुनिक बुमर तंत्र वापरून करण्यात आली आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे.भोगावे, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो.

या बोगदयाच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्याच्या कामात प्रस्तावित आहे. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठीही वायूविजन भुयार बोगद्याच्या रचनेत समाविष्ट आहे. या बोगद्यात सहा ठिकाणी जोड रस्ते असून, बोगद्यात यू टर्नची व्यवस्था आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधासुद्धा ठेवण्यात आली आहे.

या बोगद्याचे मुळ काम रिलायन्स ठेकेदार कंपनीने घेतले आहे पण प्रिया कंपनीने नेमलेली सिद्धार्थ शिंदे यांची कंपनी सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करत आहे. या सगळ्या कामावर केंद्र सरकारने नियुक्त केलेली आयएलएफ कन्सल्टंट ही कंपनी सध्या या सगळ्या कामावर सुरुवातीपासून निरीक्षण करत आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कन्सल्टिंग कंपनी यांच्या समन्वयातून निरीक्षण व तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शनाचे काम समन्वयातून सुरू आहे अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे या बोगद्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा वेळ वाचणार आहे. सध्या अवजड वाहनांना कशेडी घाटातून जवळपास ४० मिनिटांचा प्रवास करावा लागतो तोच प्रवास या बोगदा वाहतुकीतून अवघ्या पंधरा मिनिटात करता येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button