भारताच्या तिघींचा तिरंदाजीत सुवर्णवेध, ज्योती, आदिती, प्रनीतला सुवर्ण

वृत्तसंस्था : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १२ व्या दिवशी भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णवेध घेतला. ज्योती वेण्णम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी चायनीज तैपेईच्या महिला संघाला २३०-२२८ असे हरवत सुवर्णपदक जिंकले. ज्योती वेन्नमने बुधवारी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता महिलांच्या कंपाऊंड सांघिकमध्येही तिने सुवर्ण कामगिरी केली. भारताचे हे १९ वे सुवर्णपदक आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत १९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्यपदके मिळून ८२ पदके मिळवली आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
१७ वर्षीय आदिती स्वामी ही महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. साताऱ्यातील शेरेवाडी गावातील गोपीचंद स्वामी यांची ती मुलगी आहे. आदितीचे वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. जर्मनीतील बर्लिन येथील तिरंदाजीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आदितीने इतिहास रचला होता. तिने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्याआधी तिने युवा जागतिक स्पर्धेतही सुवर्णपद मिळवले होते. आदितीने सिनिअर गटातील कम्पाऊंड वैयक्तिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सांघिकमध्ये तिने सुवर्णपदक मिळवले आहे.
ज्योती सुरेखा वेन्नम ही आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. ज्योतीचे वडील पशुवैद्यक असून ते माजी कबड्डीपटूही आहेत. तिला तिच्या वडिलांकडून खेळामध्ये करियर करण्यासाठी प्रेरणा मिळाली. वयाच्या चौथ्या वर्षी ज्योतीने तीन वेळा कृष्णा नदीचे ५ किलोमीटर अंतर ३ तास २० मिनिटे आणि ६ सेकंदात पोहून पार केल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कंपाऊंड महिला सांघिक फायनलमध्ये जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्यासह पहिली भारतीय तिरंदाज बनणे ही ज्योतीची सर्वात मोठी कामगिरी होती. तिने २०२२ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच २०२३ मध्ये अँटाल्या येथे अनुक्रमे कंपाऊंड मिश्रित आणि कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदके मिळवली होती.



