संजय दत्तला आठवला आयुष्यातील कठीण काळ; म्हणाला, “तुरुंगात शिक्षा भोगणं…”

वृत्तसंस्था : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या ‘लिओ’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्त दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयसह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या संजय लिओ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अलीकडेच संजय दत्तने प्रसिद्ध शेफ रणवीर बरारच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात घडलेले अनेक प्रसंग सांगितले.
संजय दत्त म्हणाले, “जेलमध्ये जाताना मला अण्णा (सुनील शेट्टी), अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान असे सगळेजण भेटायला आले होते. तुरुंगात शिक्षा भोगणं हे माझ्यासाठी अजिबातच दिलासादायक नव्हतं…ते दिवस कठीण होते. त्यामुळे मी त्या गोष्टीचा आता जास्त विचार करत नाही. तुरुंगात मी धर्मविषयक ग्रंथ वाचले. दिवसभर व्यायाम करून शरीरयष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय स्वयंपाक करायला शिकलो. तुरुंगात असताना चांगल्या गोष्टी कशा शिकता येतील याचा मी प्रयत्न केला.”
१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाच वर्षांच्या शिक्षेपैकी सुमारे ४२ महिने त्याने तुरुंगवास भोगला, कारण खटल्यादरम्यान तो १८ महिने तुरुंगात होता. शिक्षा पूर्ण झाल्यावर अभिनेत्याने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेता लवकरच ‘लिओ’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. संजय दत्तसह अभिनेता थलपती विजय, त्रिशा कृष्णन, अर्जुन सर्जा, गौतम मेनन आणि प्रिया आनंद या कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भूमिका असतील. लिओ चित्रपट येत्या १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



