क्रीडाजगत : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर उपांत्य फेरीतीस दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता २० वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी बीसीसीआयने काही खास लोकांना निमंत्रण पाठवले आहे.
हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे. हा शानदार सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स देखील अंतिम सामना पाहण्यासाठी येऊ शकतात. त्याचबरोबर माजी कर्णधार एमएस धोनीही उपस्थित राहू शकतो. कारण बीसीसीआयने विश्वचषक विजेत्या सर्व कर्णधारांना अंतिम सामन्याचे निमंत्रण पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाहही येऊ शकतात. या सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्वांचे निमंत्रण स्वीकारणे एवढेच उरले आहे. या वर्षी मार्चच्या सुरुवातीला पीएम मोदी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदींशिवाय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही आले होते. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता.
टीम इंडिया चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याआधी २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले होते. त्याआधी २००३ आणि १९८३ मध्ये भारताने विश्वचषकाची अंतिम फेरी खेळली होती. टीम इंडियाला २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९८३ मध्ये भारत प्रथमच विश्वविजेता ठरला होता.
ऑस्ट्रेलियन संघ आठव्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. जर शेवटच्या ७ फायनलबद्दल बोलायचे, तर हा संघ ५ वेळा चॅम्पियन बनला आणि दोनदा उपविजेता ठरला आहे. कांगारू संघाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला होता, तर या संघाला १९७५ आणि १९९६ मध्ये अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. कांगारू संघाला पुन्हा एकदा विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी आहे.