२५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन

नवी मुंबई : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत धडकणार असून २५ तारखेचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. त्यांची सोय कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात येणार असल्याने एपीएमसीच्या पाचही बाजार पेठात दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत, असे परिपत्रक एपीएमसी प्रशासनाने काढले आहे.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा मार्फत आयोजित केलेल्या मराठा आरक्षण दिंडीच्या अनुषंगाने मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारात लाखो समाज बांधवांचा मुक्काम करावयाचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पाचही बाजार आवारे २५ ला बंद ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. मोर्चाच्या अनुषंगाने बाजार समितीच्या विविध बाजार आवारात व्यापारी/बाजार घटकांना शेतीमालाचा व्यवहार करणे तसेच शेतीमालाच्या वाहनांना बाजार आवारात प्रवेश करणे शक्य होणार नसल्याने २५ तारखेला बाजार समितीची पाचही बाजार आवारे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन एपीएमसी प्रशासनाने केले आहे.


