राज्यातील सागरी सुरक्षा विभागाच्या पोलिस दलातील भरती प्रक्रिया सुरू करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सागरी सुरक्षा विभागाच्या पोलिस दलातील प्रक्रिया लांबत असल्या कारणाने विरोधकांनी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले होते. यावर फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्य पोलीस दलामध्ये सागरी सुरक्षिततेसाठी असलेली पदे ही तांत्रिक स्वरूपाची आहेत. यातील सरळसेवा कोट्यातील एकूण १६२ रिक्त पदांपैकी ५० टक्के म्हणजेच ८१ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून रोस्टर तपासणीनंतर इतरही पदे भरली जातील. या प्रक्रियेस गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील सागरी सुरक्षेसाठी वेगवान बोटी चालविण्याकरिता पोलीस उप निरीक्षक (सेकंड क्लास मास्टर) गट-ब (अराजपत्रित) आणि पोलीस उप निरीक्षक (फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर) गट-ब (अराजपत्रित) ही तांत्रिक पदे आहेत. या पदांचे महत्व लक्षात घेऊन ती भरली जाईपर्यंत भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल या विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांची ११ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली असून याचा कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर विपरित परिणाम होणार नाही, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. सदस्य रमेश पाटील यांनी याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. तर या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला होता.


