पुण्यातील आपातग्रस्त लोकांचे तातडीने पंचनामे करा! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश

पुणे : पुण्यामध्ये मागील दोन पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुण्याजवळी खडकवासला साखळी धरणातील सर्व धरणे पूर्ण भरली. खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे मुठा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. पहाटे ४ वाजता हजारो क्युसेक पाणी सोडण्यात आले. यामुळे अचानक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. या सर्व नुकसानग्रस्त लोकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. या सर्वांचे लवकरात लवकर पंचनामे केले जातील असे आदेश दिले असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पुण्यामध्ये काल पाऊस वाढला असला तरी आज मात्र पावसाचा जोर उतरला आहे. पाऊस पडत नसला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. तसेच नदीला आज सकाळी ७ वाजता देखील १३ हजार ९८१ क्युसेक पाणी सोडण्यात आले. काल देखील दोन वेळा ४० हजार हून अधिक क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. यामुळे नदीचे पात्र वाढले आणि पाण्याचा प्रवाह देखील वाढला होता. त्यामुळे नदी पात्राजवळ वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये आपातग्रस्त लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे घरातील सामान वाहून गेले.
आपातग्रस्तांना अग्निशमन दलाने तातडीने मदत केली. तसेच पुण्यामध्ये जवानांचे देखील पाचारण करण्यात आले होते. बोटीमधून लोकांना बाहेर काढण्यात आले. एकतानगर, सिंहगड रोड, येरवडा, मोरया गोसावी समाधी मंदिर, खड्डा झोपडपट्टी, ताडीवाला रस्ता हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले. याबाबत चंद्रकात पाटील यांनी आढावा घेत प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, लवकरच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होतील. नागरिकांना योग्य ती मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकार मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे.


