सातारा जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’; ८०० कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, जावळी, पाटण, कराड या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील दरड प्रमाण क्षेत्रातील सुमारे ८०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे खाजगी शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक शाळांना शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यातही पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई तालुक्यात संततधार सुरू आहे. शुक्रवारी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या यांना सुट्टी जाहीर केली आहे.
महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यातील ८०० कुटुंबांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील गेल्यावर्षी पूर परिस्थितीने ग्रस्त झालेल्या गावांची पहिली सुरक्षित कॉलनी तयार होत असून, सुमारे साडेपाचशे घरे यानिमित्ताने उभी राहणार आहेत. त्याची निविदा काढण्यात आली असून, प्रत्यक्ष कामाला पाऊस संपल्यानंतर सुरुवात होणार आहे.


