
नवीदिल्ली : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ७५ टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात ४ महिन्यांच्या अंतराने तीन टप्प्यात २-२ हजार रुपये अशी पाठवली जाते. आता १ फेब्रुवारी २०२३ रोजी मोदी सरकार बजेट सादर करणार आहे. २०२४ ला लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा आहेत. या दरम्यान शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे.
सूत्रानुसार, पीएम किसान निधी योजनेतील रक्कम वाढण्याची शक्यता आहे. याबाबतची केंद्रीय अर्थसंकल्पात होईल असं बोललं जात आहे. प्रत्येक वर्षी मिळणारी ६ हजार रुपयांची रक्कम आणखी वाढवली जाऊ शकते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना ६००० रुपयांऐवजी ८००० रुपये मिळतील, अशी आशा आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना चार टप्प्यात २-२ हजार रुपयांची रक्कम मिळेल. शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांच्या अंतराने हे पैसे ट्रान्सफर केले जातील.
पीएम किसान सम्मान निधीचा १३ वा हप्ता जानेवारी २०२३ रोजी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरकारने १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. या पैसे शेतकऱ्यांना वीज, खत यांची आपुर्ती करता येते. रक्कम वाढवल्यास दुसरा हप्ता एप्रिल महिन्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा आरंभ झाला तेव्हा फक्त २ हेक्टर किंवा ५ एकर शेती योग्य जमीन असेल तर लाभ मिळत होता. आता केंद्र सरकारने ही अट शिथिल केली आहे.



