महेश मांजरेकर मराठमोळ्या कलाकारांविषयी म्हणाले; मराठी सिनेसृष्टीकडे ‘स्टार्स’ नाहीत पण…

मुंबई : ‘मराठी सिनेसृष्टीकडे ‘स्टार्स’ नाहीत तर अलौकिक प्रतिभा असलेले ‘कलाकार’ आहेत. अगदी छोट्यातल्या छोट्या भूमिका साकारायला कसलेले कलाकार मिळतात’, असं निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर सांगतात. त्यांची निर्मिती असलेल्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘एका काळेचे मणी’ या सीरिजचा बोलबाला आहे,
– कुटुंबाबरोबर बसून एन्जॉय करण्यासारखी सीरिज आहे. कारण यात प्रासंगिक विनोद करण्यात आले आहेत. उगाच ओढूनताणून किंवा मर्यादा ओलांडून विनोद करण्यात आलेले नाहीत. यातील कलाकार हीदेखील सीरिजची जमेची बाजू आहे. करोनाकाळात मराठी नाटकांना नवसंजीवनी देण्याचं काम प्रशांत दामलेनं केलं, यासाठी त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तो या सीरिजचा मोठा यूएसपी आहे. वंदना गुप्ते, समीर चौघुले, विशाखा सुभेदार यासारखे कलाकार सीरिजमध्ये आहेत. कलाकारांचं पॅकेज हाच सीरिजचा यूएसपी आहे.
– ‘एका काळेचे…’ सीरिजची कल्पना ऋषी मनोहर, ऋतुराज शिंदे आणि ओम भूतकर या तिघांची होती. सीरिजचं श्रेय त्या तिघांना जातं. संपूर्ण कुटुंब एकत्र बघू शकेल अशी ती सीरिज आहे. त्यामुळे कुठेही कंबरेखालचे विनोद अथवा विनोदाची पातळी घसरणार नाही याची काळजी घेतली आहे.
– आपल्या मराठी सिनेसृष्टीकडे ‘स्टार्स’ नाहीत, जे प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतील; पण आपल्याकडे अलौकिक प्रतिभा असलेले ‘कलाकार’ आहेत. आपल्याला अगदी छोट्यातल्या छोट्या भूमिका साकारायला कसलेले कलाकार मिळतात, ही मराठी सिनेसृष्टीची जमेची बाजू आहे. अशाच अप्रतिम कलाकारांचं ‘एका काळेचे मणी’ या सीरिजमध्ये पॅकेज बांधणं शक्य झालं.
– ओटीटी (ओव्हर द टॉप) हे भविष्य आहे. यापुढे सिनेमा आणि वेब ही दोन्ही माध्यमं समांतर राहतील. काही अंशी वेबविश्वामुळे सिनेमांना फायदाच झाला आहे. यामुळे प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत. प्रेक्षक आशयाच्या गुणवत्तेला प्राधान्य देऊ लागले आहेत. हे होणं गरजेचं होतं. यामुळे सिनेमांचा दर्जादेखील सुधारत आहे
– एखादी भूमिका चोखपणे निभावण्यासाठी ‘स्टार’ नाही तर योग्य ‘कलाकार’ पाहायला मिळत आहेत, याचं समाधान वेबविश्वामुळे प्रेक्षकांना मिळतंय. मराठीत स्टार नसले तरी अप्रतिम कलाकार आहेत. आपल्याकडील कलाकारांना नाटकाची पार्श्वभूमी आहे. स्टार सिस्टीम तोडून टाकण्यात ओटीटीचा मोठा हात आहे. आज मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत असताना कलाकारांचे सिनेमे चालत आहेत. याचं श्रेय ओटीटीला देणं आवश्यक आहे. चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करणारे कलाकार आज वेबविश्व दणाणून सोडत आहेत.
– मराठी चित्रपट आशयाच्या दृष्टीनं पूर्वीपासूनच पुरोगामी आहे. फक्त स्वत:ला बजेटच्या बंधनात अडकवून घेतलं असल्यामुळे तिथे घोळ होतो. तीन कोटी रुपयांमध्येच चित्रपट बनवायचा ही मानसिकता बदलायला हवी. आपल्यासमोर २०० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटांची स्पर्धा आहे. आपली गाडी बजेटवरच अडली आहे. आपल्याकडे कन्टेंट आहे; पण आवाका वाढवणं आणि गुणवत्ता सुधारणं आवश्यक आहे. दर्जेदार आशयाला चांगलं बजेट मिळालं तर आपलाही सिनेमा पुढे येईल. आज प्रेक्षक ४००-५०० रुपये खर्च करून नाटक बघायला जातात, म्हणजे प्रेक्षक खर्च करायला तयार आहे, त्यांना दर्जेदार आणि आशयघन कलाकृती दाखवणं आवश्यक आहे. आपल्या कल्पनेतला चित्रपट हा कमी बजेटमुळे कल्पनेपुरताच मर्यादित राहतो, याची खंत वाटते.
– आपण समाजात जे घडतंय ते कलाकृतीत दाखवतो. निर्माते म्हणून काही बंधनं वा मर्यादा पाळणं आवश्यक आहे. तसंच प्रेक्षकांच्या बाबतीतही आहे. आता प्रेक्षकही पुरोगामी विचारांचे झाले आहेत. दुसरं म्हणजे आपल्याकडे थेट नाव घेता येत नाही. हेच परदेशात अमुक एका व्यक्तीवर कलाकृती बनत असेल तर तिथं नाव घेतलं जातं. हे आपल्याकडे शक्य झालं तर आपल्याकडे भन्नाट कथा सांगितल्या जातील. जीवनपट बनवताना त्या व्यक्तीच्या आयुष्याची सकारात्मक बाजू दाखवताना नकारात्मकही दाखवली गेली पाहिजे. मुद्दा राहिला, सध्या घडत असलेल्या घटनांचा; तर त्या कुणी ठरवून बनवत नाहीत.
मांजरेकर म्हणाले की, ‘मराठी रिअॅलिटी सीरिजची एक कल्पना डोक्यात आहे. तसं काही आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या शहरातच एवढ्या गोष्टी आहेत आणि मराठी साहित्य समृद्ध आहे, त्याला व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे, येत्या काळात ते मिळेल अशी खात्री आहे.’



