भारत

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील अभिमानाचा क्षण, चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण

श्रीहरीकोटा : भारताच्या चांद्रयान-३ चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एलव्हीएम-३ च्या सहाय्याने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ उड्डाण करण्यात आले. आता ४२ दिवसांनी हे यान चंद्राच्या भूमीवर लँड करणार आहे. चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर आणि ते पृथ्वीच्या इच्छित कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर इस्रोच्या अध्यक्षांनी संपूर्ण देशाला ही आनंदाची बातमी दिली. त्याच बरोबर त्यांनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.

> चांद्रयान-३ चे प्रक्षेपण इच्छित कक्षेत मिशनसह यशस्वी झाले . LVM3 ने चांद्रयान-3 ला पृथ्वीभोवती इच्छित कक्षेत प्रस्थापित केले.

चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. तसेच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणे आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणे ही यामागची उद्दिष्ट्ये आहेत.

>दुपारी २.३५ ला श्रीहरीकोटाच्या दुसऱ्या लाँचपॅडवरून यशस्वी प्रक्षेपण
> १६ मिनिटांमध्ये ‘एलव्हीएम-३’ रॉकेटमधून ‘चांद्रयान-३’ विलग होऊन पृथ्वीभोवती १७० बाय ३६५०० किमीची दीर्घ वर्तुळाकार कक्षा प्राप्त केली
आता पुढील काही दिवसांत यानाची पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल. या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल. वाढलेल्या गतीचा उपयोग करून यानाला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर यान चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडले जाईल. त्यानंतर दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अखेर ‘चांद्रयान-३’ला चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. अखेर २३-२४ ऑगस्टला (किंवा सप्टेंबर अखेरीस) प्रोपल्जन मॉड्यूलपासून विलग केले जाईल आणि ‘लँडर’ चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.

चांद्रयान-३चे प्रक्षेपण पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकात आली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हे प्रक्षेपण दाखवण्यात आले आहे.

‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button