देशविदेशभारत

UNSC मध्ये भारताने इस्रायल-हमास युद्धाबाबत स्पष्ट केली आपली भूमिका

वृत्तसंस्था : इस्रायल-हमास युद्धामुळे दोन्ही देशांतील अनेक नागरिकांचा हाकनाक बळी गेला आहे. युद्धाच्या १९ व्या दिवशीही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरू असून सततचा बॉम्ब वर्षाव आणि वीजेच्या अभावामुळे रुग्णालये बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर, अनेकांना मानवतावादी सुविधाही मिळत नसल्याने तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी भारताने हस्तक्षेप घेतला असून संयुक्त राष्ट्रसंघ संरक्षण परिषदेच्या खुल्या चर्चासत्रात याप्रकरणी भाष्य केलं आहे.

संयुक्त राष्ट्रासंघातील भारताचे प्रतिनिधी आर. रविंद्र यांनी या परिषदेत भारताची बाजू स्पष्ट केली. “इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धात नागरिकांचा मृत्यू होणं ही चिंतेची बाब आहे. सर्व पक्षांनी नागरिकांचं आणि खासकरून महिला आणि मुलांचं संरक्षण केलं पाहिजे. मानवतावादी समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे”, असं रविंद्र यांनी सांगितलं.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याकरता भारताचं समर्थन आहे. तसंच, या दोन्ही देशांतील परिस्थिती सामान्य व्हावी याकरता आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा असून दोन्ही देशांच्या समस्यांच्या निराकारणासाठी भारत वचनबद्ध आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, भारताने ३८ टन साहित्य गाझा पट्टीतील नागरिकांसाठी पाठवले असल्याचीही माहितीही या परिषदेत दिली.

गाझातील ५ हजार ७९१ पॅलेस्टाईन नागरिकाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, तर, वेस्ट बँक येथे ९६ पॅलेस्टाईन नागरिकांनी या युद्धात जीव गमावला आहे. १६५० पॅलेस्टाईन नागरिकांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button