
वृत्तसंथा : ज्या लोकांना अद्भुत, चमत्कारिक आणि रहस्यमयी गोष्टींमध्ये रस आहे ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच खास ठरेल. आपल्या देशात प्राचीन संस्कृती आणि परंपरांचे आजही विविध भागांमध्ये जतन केले जाते. संपूर्ण देशभरात अनेक मंदिरे आहेत. ज्यांपैकी काही मंदिरांमध्ये रहस्य आणि आश्चर्यकारक गूढ दडलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिर. या मंदिराविषयी तुम्ही आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या वाचल्या असतील. ज्यामध्ये मंदिराच्या तळघरात दडलेल्या रहस्याचा सुद्धा उल्लेख केलेला असेल. आज आपण याच रहस्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत.
माहितीनुसार, श्रीविष्णूंना समर्पित असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकात बांधले होते. या घराण्याने आपले जीवन, संपत्ती आणि सर्वस्व या मंदिराला अर्पण केले होते. सन १७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी पद्मनाभ मंदिरावर आपला हक्क सांगितला आणि तेव्हापासून हे घराणे मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे. मुख्य म्हणजे, या मंदिराच्या एका कणाचाही वापर ते स्वतःसाठी करत नाहीत. तसेच मंदिरातून बाहेर पडताना आजही ते पाय धुऊन बाहेर पडतात. जेणेकरून मंदिराच्या मातीचा एखादा कण त्याच्यासोबत बाहेर पडू नये.
पद्मनाभ मंदिराच्या तळघरात एकूण ७ दरवाजे आहेत.काही वर्षांपूर्वी त्यापैकी ६ दरवाजे खुले करण्यात आले होते. मात्र, सातवा दरवाजा अद्याप बंद आहे. असे म्हटले जाते की, या दरवाजामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम आहे. या दरवाजामागे नेमकं असं काय आहे? याविषयी प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.
पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा हा स्टीलचा असून त्याला कुठलीही कडी किंवा कुलूप नाही. या दरवाजावर दोन सापांच्या आकृती रेखाटण्यात आलेल्या आहेत. असे म्हटले जाते की, त्रावणकोरच्या राजांनी अत्युच्च दर्जाची अपार संपत्ती या तळघरात ठेवली आहे. या सातव्या दरवाजाचे संरक्षण २ सर्पराज करतात, असे बोलले जाते. जेव्हा हा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा २ जणांचा सर्पदशांने मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा दरवाजा खुलल्यास अशुभ घटना घडतील आणि इथला काही भाग शापित आहे, अशी मान्यता आहे.
या मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा नाग पाशम मंत्राचा प्रयोग करून बंद करण्यात आला होता, असे म्हटले जाते. तर काहींच्या मते, या दरवाजापाशी कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. हा दरवाजा खुला केल्यास महाप्रलय येऊन मोठे जलमय संकट येऊ शकते, असा दावा केला जातो.
पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा अत्यंत रहस्यमयी असून तो कसा खुलणार याविषयी बोलायचे झाले तर, काही मान्यतांनुसार हा दरवाजा उघडण्यासाठी गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण होणे आवश्यक आहे. मात्र, आजपर्यंत असा एकही सिद्ध व्यक्ती सापडलेला नाही, जो गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण करेल. समजा, एखाद्याने गरुड मंत्र अचूक म्हणण्याचा प्रयत्न केला पण तरीही चुकला तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. अशी अनेक रहस्य या मंदिरात दडलेली असून देशातील सर्वात गुढमय मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख केला जातो.



