सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस होणार लवकरच सुरु; दक्षिण भारताला मोदी सरकारची भेट

केंद्र सरकारकडून दक्षिण भारताला आणखी एक भेट मिळणार आहे. मोदी सरकार दक्षिण भारताला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहे. ही ट्रेन दोन प्रमुख राज्यांना जोडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही दक्षिण भारतातील दोन प्रमुख राज्य जोडली जातील आहे. ८ एप्रिल २०२३ रोजी या ट्रेनचं उद्घाटन पार पडणार आहे. ही दक्षिण भारतातील आठवी वंदे भारत ट्रेन असेल.
देशातील प्रत्येक भाग सेमी-हाय स्पीड ट्रेनने जोडण्यासाठी देशभरातील वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे सातत्याने करत आहे. आतापर्यंत अनेक राज्ये या रेल्वे प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. आता दक्षिण भारताला पुन्हा एकदा वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.
भारतीय रेल्वेकडून सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ८ एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे. ही ट्रेन सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानच्या शहरांमधून तिरुमला तिरुपती मंदिर येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी वरदान ठरणार आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरु करण्यात आलेली आधुनिक सुविधा असलेली सेमी-हायस्पीड ट्रेन सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन सुरू झाल्यापासून १०० टक्के प्रवाशांसह धावत आहे.
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस दोन तेलगु राज्यांना जोडेल. सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन इतर ट्रेनप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस धावेल. सध्या रेल्वेने या ट्रेनचा मार्ग, भाडे आणि वेळ याबाबतची माहिती दिलेली नाही. येत्या काही दिवसांत रेल्वे याबाबत अधिक माहिती देईल.



