महाराष्ट्रासह देशातील शेती अन् शेतकऱ्यांसंदर्भात इस्त्रोचा धक्कादायक अहवाल..

नवी दिल्ली : सध्या शेतकरी सातत्यानं अनेक संकटांना तोंड देत आहे. एकामागून येणाऱ्या संकटामुळे शेतकरी राजा अस्वस्थ झालाय. दरम्यान, अशातच भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) एक महत्वाचा अहवाल तयार केला असून यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचा चिंता वाढवणार आहे.
इस्त्रोने महाराष्ट्रासह देशातील शेती अन् शेतकऱ्यासंदर्भात एक महत्वाचा अहवाल तयार केला असून त्यात देशाचा वाळवंटीकरण आणि जमिनीचा खालावलेला दर्जा यावर अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील २९ टक्क्यांहून अधिक जमिनीचा दर्जा खालावला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
सर्वाधिक दर्जा खालावलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामध्ये राजस्थान, गुजरात, कर्नाटक, लडाख, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील जमिनीचा दर्जा कामालीचा खालवला असल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार देशातील ९७.८५ दशलक्ष हेक्टर म्हणजे २९.७ टक्के जमिनीचा दर्जा खालावला आहे. यातील ८३.६९ दशलक्ष हेक्टर जमिनीचे वाळवंटीकरण झालेय आहे.
पाणी आणि हवेमुळे जमिनीची होत असलेली धूप, हिरवळ कमी होणे, हवामान बदल अशा सर्व कारणांमुळे जमिनीचा दर्जा खालावत असल्याचे म्हटले आहे.
हवामान बदलाचा परिणाम हा अंदाजापेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे बेमोसमी पाऊस पडणे आता सामान्य झाले आहे. २०३० पर्यंत पीक उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल असे मानले जाते. या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा मका आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तापमानात अंदाजे वाढ, पावसाच्या स्वरुपात बदल आणि मानववंशीय हरितगृह वायू उत्सर्जनातून पृष्ठभागावरील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे पीक उत्पन्नात मोठा बदल होणार आहे.



